मध्य महाराष्ट्रात मुसळधार लवकरच व्यापरणार देश, रायगडला आज रेड अलर्ट , आपत्कालीन यंत्रणा सज्ज, खबरदारी घेण्याचे आवाहन
त. भा. प्रतिनिधी
पुणे/मुंबई,
गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान हवेचा दबाव आहे. याशिवाय मान्सून सक्रिय आहे. गेले काही दिवस राज्यात दमदार पाऊस होत आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची तीव्रता अधिक आहे. गेल्या 24 तासांत पालघर, मुंबई, ठाणे, रायगड,रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतीवृष्टी तसेच मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मंगळवार 7 पर्यंत राज्यात पावसाचा प्रभाव राहणार आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, येत्या काही दिवसांत याची तीव्रता वाढणार आहे. राजस्थानपासून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा दाब आहे. यामुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा दबाव कायम आहे.
वरील सर्व हवामानातील घडामोडींमुळे मान्सून सक्रिय गेल्या तीन ते चार दिवसांत सक्रिय झाला असून, त्याने गुऊवारी संपूर्ण दिल्ली व्यापत पंजाब, हरियाणा तसेच राजस्थानाचा काही भाग व्यापला. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून, लवकरच तोदेश व्यापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नैत्य मोसमी वाऱ्यांनी गुऊवारी राजधानी दिल्ली काबीज करीत पुढे हरियाणा, पंजाब, राजस्थानमध्येही शिरकाव केला. सर्वसाधारणपणे मान्सून 30 जूनपर्यंत दिल्ली गाठतो. यंदा त्याने दोन दिवस उशिरा दिल्लीत प्रवेश केला आहे.
आज या जिल्ह्यांना रेड अलर्ट
रायगड, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर सातारा घाट, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
प्रशासकीय सूचनांचे पालन करा : मंत्री महाजन
राज्यात दमदार पावसाला सुऊवात झाली असून गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस सुरू आहे. विशेषत: मुंबईत चांगला पाऊस होत असून राज्यातील काही जिह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्री महाजन म्हणाले, राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी नद्या, नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिह्यांतील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.
आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
मंत्री महाजन यांनी मंत्रालयातील राज्य आपत्त्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन पाहणी केली आणि अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शासकीय यंत्रणेस सतर्कतेच्या सूचना दिल्या. याप्रसंगी विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, संचालक डॉ भालचंद्र चव्हाण उपस्थित होते.
मंत्री महाजन म्हणाले, भारतीय हवामान विभागाने 3 आणि 5 जुलै रोजी राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
राज्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षित राहावे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.नागरिकांना आपत्तकालीन परिस्थितीत संपर्कसाठी राज्य आपत्तकालीन नियंत्रण कक्षाचे 24 बाय 7 हेल्पलाइन क्रमांक 1070, 09321587143, 022-22027990, 022 -22794229 असून जिल्हास्तरीय संपर्क क्रमांक 1077 आहे.