For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

MH CET 2025 : परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांची उशिरा हजेरी, पालकांनी धरलं धारेवर

01:37 PM Apr 20, 2025 IST | Snehal Patil
mh cet 2025   परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांची उशिरा हजेरी  पालकांनी धरलं धारेवर
Advertisement

सीईटीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची, मात्र पर्यवेक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थी, पालकांत गोंधळाची स्थिती

Advertisement

रत्नागिरी : राज्य सीईटी कक्षातर्फे आयोजित विविध अभ्यासक्रमांसाठीच्या 19 प्रवेश परीक्षेदरम्यान रत्नागिरीमधील शासकीय फार्मसी कॉलेज येथील परीक्षा केंद्रावर शनिवारी गोंधळ उडाला. पेंद्रावर पर्यवेक्षक उशिरा पोहोचल्याने विद्यार्थी व पालक कमालीचे संतप्त झाले होते. या प्रकाराची माहिती मिळताच पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने सीईटी कमिशनरशी संपर्क साधला आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

राज्य सीईटी कक्षातर्फे आयोजित विविध अभ्यासक्रमांसाठीच्या 19 प्रवेश परीक्षा शनिवारपासून रत्नागिरीत सुरू झाल्या. रत्नागिरीतील शासकीय फार्मसी कॉलेज येथे सीईटी परीक्षेसाठी केंद्र निश्चित करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसोबत पालकही पहाटे 5 वाजल्यापासून उपस्थित होते. मंडणगड, राजापूर, खेड, चिपळूण अशा जिह्याच्या टोकापासून सुमारे 100 हून अधिक विद्यार्थी या केंद्रावर पोहोचले होते.

Advertisement

सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत विद्यार्थ्यांना केंद्रावर नोंदणी करायची होती आणि 9 वाजता परीक्षेला सुरुवात होणार होती. परंतु 8.15 पर्यंत केंद्रावर एकही पर्यवेक्षक उपस्थित नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पर्यवेक्षकांच्या या हलगर्जीपणावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सीईटीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, पर्यवेक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चलबिचल सुरू झाली.

अखेर सकाळी 8.15 वा. पर्यवेक्षक धावत-पळत केंद्रावर पोहोचले. त्यानंतर 8.30 वा. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. नंतर 9 वाजता परीक्षा सुरू झाली. संतप्त पालकांनी या बाबत पर्यवेक्षकांना जाबही विचारला. आज पर्यवेक्षक उशिरा आले, पण उद्या जर एखादा विद्यार्थी उशिरा आला तर त्याला परीक्षा देण्याची परवानगी मिळेल का? असा सवाल पालकांनी उपस्थित केला. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लाला

या घटनेमुळे सीईटी परीक्षा केंद्रांवरील व्यवस्थापन व पर्यवेक्षकांच्या जबाबदारीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सीईटी कक्षाने अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. रत्नागिरीतील विद्यार्थी आणि पालकांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या तातडीच्या हस्तक्षेपाचे स्वागत केले आहे. तरीही अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.

मंत्री सामंतांमुळे सर्व विद्यार्थ्याना मिळाला पुरेसा वेळ

परीक्षेपूर्वी केंद्रावर झालेल्या या गोंधळाची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांच्या कानावर घालण्यात आली. यानंतर सामंत यांनी तत्काळ सीईटी कमिशनरशी संपर्क साधला. त्यांनी कमिशनरना स्पष्ट सूचना दिल्या की, कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. सामंत यांच्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे केंद्रावरील परिस्थिती नियंत्रणात आली. आता विद्यार्थ्यांनी लॉगईन केल्यानंतर त्यांचा वेळ मोजला जाणार आहे. सीईटी कमिशनर यांनी सामंत यांच्या सूचनेनुसार सर्व विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisement
Tags :

.