महाराज, शिवराज अन् नाराज
भाजपसंबंधी दिग्विजय यांची अनोखी टिप्पणी : मध्यप्रदेशातील ’3 भाजप’चा समजाविला अर्थ
मध्यप्रदेशात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात स्वत:ला झोकून दिले आहे. सध्या राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा काळ सुरू आहे. याचदरम्यान बुधवारी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपवर उपरोधिक टिप्पणी केली आहे. राज्यातील भाजप तीन गटांमध्ये विभागला गेला आहे. यात महाराज भाजप (ज्योतिरादित्य सिंधिया), शिवराज भाजप (मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान) आणि नाराज भाजप (बंडखोर) सामील असल्याचा दावा दिग्विजय यांनी केला आहे. ग्वाल्हेर येथील एका काँग्रेस उमेदवारासाठीच्या प्रचारसभेला त्यांनी संबोधित केले आहे.
काँग्रेसचा विश्वासघात केलेल्या लोकांच्या विरोधात आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. ही निवडणूक धनशक्ती आणि जनशक्ती यांच्यातील आणि एक विश्वासघाती तसेच निष्ठावंत यांच्यामधील आहे. 2018 मध्ये मला तसेच कमलनाथ यांना पक्ष संघटन उभे करण्यास केवळ 5 महिन्यांचा कालावधी मिळाला होता. परंतु आता पक्षसंघटन पूर्णपणे तयार असल्याचा दावा दिग्विजय यांनी केला.
पूर्वी विरोधात एकत्रित भाजप होता, परंतु आता भाजप तीन गटांमध्ये विभागला गेला आहे. महाराज भाजप, शिवराज भाजप आणि नाराज भाजप अशा विखुरलेल्या गेलेल्या पक्षाविरोधात आमची ही लढाई असल्याचे वक्तव्य दिग्विजय यांनी केले आहे.
शिवराज यांच्याविरोधात मोठी नाराजी
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात मोठा आक्रोश आहे. 2018 मध्ये याहून अधिक नाराजी होती. कामगारांना भाजपने जितके नुकसान पोहोचविले आहे, तितके अन्य कुणीच पोहोचवू शकत नसल्याची टीका काँग्रेसच्या या मातब्बर नेत्याने केली आहे.
..तर माझ्या घराचे दरवाजे बंद
याचबरोबर दिग्विजय सिंह यांनी उमेदवारीची मागणी करणाऱ्या परंतु पक्षात सक्रीय नसलेल्या नेत्यांना इशारा दिला आहे. अशाप्रकारच्या नेत्यांसाठी दिग्विजय सिंहच्या घराचे दरवाजे नेहमी बंद असतील. भाजपचे लोक पूर्वी मतपत्रिकेत फेरफार करायचे. परंतु आता ते ईव्हीएममध्येही देखील फेरफार करू शकतात. ईव्हीएम काँग्रेसची मते कमी करू शकत नाही, परंतु भाजपच्या मतांची संख्या वाढवू शकते असा दावा त्यांनी केला आहे.
ईव्हीएमचा वापर रोखा
चिप असलेली कुठलीच मशीन स्वत:ला हाताळणाऱ्याचा आदेश मानणार नाही, तर ज्याचे सॉफ्टवेअर वापरण्यात आले आहे, त्याचा आदेश मानेल. यासंबंधी माहिती केवळ निवडणूक आयोगाला आहे. कुठल्याही देशात ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणूक होत नाही आणि पाकिस्तान तसेच बांगलादेशने देखील हा वापर रोखला आहे. आता निवडणुकीच्या दिवशीच ईव्हीएमची विश्वासार्हता सिद्ध होऊ शकते असे दिग्विजय यांनी म्हटले आहे.