महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीकृष्णा तुम्ही माझा वध केलात तरच मी शुद्ध होईन

06:27 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

आपल्या हातून फार मोठा अनर्थ घडला. श्रीकृष्णाला बाण मारून आपण घनघोर पाप केले असून त्या पापाला क्षमा नाही हे जराव्याधाला कळून चुकले. जो जगाचा ताप नाहीसा करतो त्या चित्स्वरूप परमात्म्याला मी संताप दिला हा विचार त्याला चैन पडू देईना. तो तसाच धावत धावत गेला आणि त्याने श्रीकृष्ण चरणी लोटांगण घातले. मधुसूदनाचे चरण त्याने घट्ट पकडले आणि तो धाय मोकलून रडू लागला. श्रीकृष्णाने त्याला उठवायचा खूपवेळा प्रयत्न केला पण काही केल्या कृष्णाच्या पायांना मारलेली मिठी सोडायला तो तयार होईना. सकल सृष्टीवर कृपा करणाऱ्या, श्रीकृष्णाने त्याच्यावर एक कृपादृष्टी टाकून त्याला क्षमा करावी असे त्याचे मागणे मांडण्यासाठी तो अत्यंत कळकळीने श्रीकृष्णाला प्रार्थना करू लागला. भयभीत झालेला जराव्याध श्रीकृष्णाला म्हणाला, मी पापी पापाकर्मा, महापापी पापात्मा आहे. पुरुषोत्तमा कृपाळुवा हा माझा अपराध पोटात घेऊन मला क्षमा करा. तुमचा कृपाळूपणा त्रिजगतात प्रसिद्ध आहे. कित्येकांवर तुम्ही कैकवेळा कृपा केली आहे. तुम्ही गर्भात असलेल्या परीक्षित राजाचे रक्षण केलेत. गजेन्द्राने जेंव्हा अत्यंत आकांताने तुम्हाला हाक मारली तेंव्हा कृपामूर्ती तुम्ही उडी घालून त्याला वाचवलेत. पांडव लाक्षागृहात जळत असताना तुम्ही त्यांना विवरातून बाहेर काढलेत. मी हातात शस्त्र घेणार नाही अशी भारतीय युद्धाच्या सुरवातीला तुम्ही प्रतिज्ञा घेतली होती पण जेंव्हा भक्तराज अर्जुन युद्धात भीष्माकडून पराजित होण्याची वेळ आली तेंव्हा तुम्ही त्याचे रक्षण करण्यासाठी तुमची प्रतिज्ञा मोडून युद्धात उतरण्याची तयारी केली होती. द्रौपदीने जेव्हा तुम्हाला निकराचे साकडे घातले, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता ती तिळभरसुद्धा उघडी पडू नये म्हणून तुम्ही लुगडी पुरवलीत अशा भक्तांवर कृपा केल्याच्या एक ना अनेक कथा श्रुती पुराणातून सांगितलेल्या आहेत. तुमची उत्तम कीर्ती महासिद्ध ऋषीमुनी स्तोत्रातून वर्णन करतात. माझ्याकडून अजाणतेपणे दुष्कर्म झाले. कृपाळु, परमात्मा, पुरुषोत्तमा तुम्ही माझ्या अपराधाला क्षमा केली पाहिजे. अजामिळ दुराचारी होता. तो पुत्रलोभाने नामाचा उच्चार करत असे. तरीही त्याचे पाप नाहीसे झाले. अशी पापाचा नाश करणारे म्हणून नामाची थोरवी आहे. नामाने दुर्मती निष्पाप होतात, नामाने पितृघाती निष्पाप होतात, नामाने दुराचारी तरुन जातात. ज्या विष्णूच्या नामाने माणसाचे कोटीजन्मांचें घोर अज्ञानाचे निर्दालन होते आणि ते घेणाऱ्याचे संपूर्णपणे कल्याण होते त्याच्या स्वरुपाची मला जाणीव आहे. त्याला मी बाण मारला. ज्याचा अगाध महिमा साधु सज्जन सदा वर्णन करताना म्हणतात, स्वरूपाने सच्चिद्घन असलेला श्रीकृष्ण जगाचा स्वामी आहे. अशा जगाचे जीवन असलेल्या कृष्णाला मी निर्वाणीचा बाण मारला. हा केव्हढा घोर अपराध मी केला. त्रैलोक्याचा राजा असलेल्या श्रीकृष्ण समर्थाचा मी घात केला. ह्या जगाचा श्रीकृष्ण हा आत्मा आहे त्याचाच आत्मघात मी केला. श्रीकृष्ण जगाचा निर्माणकर्ता आहे त्या पित्याचा घात माझ्या हातून झाला. श्रीकृष्ण माता होऊन जगाचे पालन करतो, त्या मातेचाच घात मी केला. श्रीकृष्ण ब्राह्मणांना ब्रह्मबोध करतात त्यांचा वध म्हणजे माझ्या हातून ब्रह्मवध झाल्यासारखेच आहे. ह्यापेक्षा घोर अपराध जगात दुसरा नसेल. श्रीकृष्णांना बाण मारून एकाचवेळी राजघात, आत्मघात, मातृपितृ-ब्रह्मघात असे अनेक अपराध माझ्या हातून घडले. आता हृषीकेशी माझ्यावर कृपा करून मी रचलेल्या पापांच्या राशी निक्रिय होतील असा उपाय लवकर करा. तुम्ही नुसती कृपा करून माझ्या घोर अपराधाचे परिमार्जन होणार नसल्याने तुम्ही माझा वध करा. म्हणजेच माझी शुद्धी होईल.

Advertisement

क्रमश:

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article