कूपनलिका खोदाई करणाऱ्यांकडून लूट
शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्यासाठी शेतकऱ्यांकडून कूपनलिका खोदाई करण्यात येत आहे. मात्र एजंट व कूपनलिका खोदाई करणाऱ्यांकडून मनमानी दर आकारला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यावर तोडगा काढण्यात यावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी नेगिलयोगी रयत संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सध्या कूपनलिका खोदाईसाठी मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कूपनलिका खोदाई करणाऱ्या मालकांकडून मनमानी दर आकारले जात आहेत. शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना कूपनलिका खोदाई करणाऱ्यांकडून केली जाणारी लूट थांबविण्यात यावी. यामध्येही एजंटगिरी केली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कूपनलिका खोदाई करणाऱ्यांना व शेतकऱ्यांना बोलावून संयुक्त बैठक करून दर ठरविण्यात यावेत, अशी मागणी केली. ग्रामीण भागात ग्राम पंचायतीमधून दिल्या जाणाऱ्या संगणक उताऱ्यासाठी ग्राम पंचायतीकडून लूट केली जात आहे. 20 ते 25 हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे गरजू गोर-गरीब नागरिकांची लूट केली जात आहे. बँक व सहकारी संस्थांमधून कर्ज काढण्यासाठी संगणक उताऱ्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे गरजू नागरिकांची गरज ओळखून लूट केली जात आहे. यावर निर्बंध घालण्यात यावेत व सरकारी शुल्क आकारून संगणक उतारे देण्यात यावेत. शेतकऱ्यांकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या पिकांना योग्य भाव देण्यात यावा, कष्ट करून पिकविण्यात आलेले पीक कवडीमोलाने विक्री केले जात आहे. दलालांची चांदी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.