निरक्षरांची यादी; किती खरी किती खोटी?
शहरात नागरिक सुशिक्षित, निरक्षर शोधायचे कुठे? बोगस नावांची लागणार वर्णी
बेळगाव : जि. पं. कार्यालयाकडून शिक्षण विभागाला व शिक्षण विभागाकडून शिक्षकांना निरक्षर यादीसाठी टार्गेट देण्यात आले आहे. शहरात निरक्षरांची संख्या कमी असल्याने निरक्षर कोठून शोधायचे? असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. परंतु, शिक्षण विभागाकडून सक्ती केली जात असल्याने निरक्षरांची बोगस यादी तयार होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून साक्षरता मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. बेळगाव जिल्ह्यात निरक्षरांची संख्या शोधून त्यांना साक्षर करण्यासाठी जिल्हा पंचायत व शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
परंतु, जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे यांनी सक्तीने ही मोहीम राबविण्यास सांगितल्याने शिक्षण विभागाकडून शिक्षकांवर दबाव टाकला जात आहे. प्रत्येक शाळेने किमान 50 निरक्षरांची यादी तयार करण्याची सक्ती करण्यात आली आहे. निरक्षरांची केवळ यादी करून चालणार नाही तर निरक्षरांची संपूर्ण माहिती उल्हास अॅपमध्ये भरावी लागत आहे. निरक्षराचे वय, आधारकार्ड, कौटुंबिक माहिती द्यावी लागत आहे. शहरी भागात निरक्षरांची संख्या क्वचितच आहे. त्यातच सुशिक्षित भागात निरक्षर कोठून आणायचे? असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. निरक्षरांची यादी केल्यानंतर पुन्हा त्यांना प्रशिक्षण देऊन साक्षरही शिक्षकांनाच करावे लागणार आहे.
साक्षर परिचितांनाच निरक्षर बनविण्याची युक्ती
शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळेला टार्गेट देण्यात आल्याने शहरात सर्रास ठिकाणी बोगस नोंदणी केली जात आहे. निरक्षरच मिळत नसल्याने आपल्या परिचितांनाच निरक्षर बनविण्याची युक्ती शिक्षकांनी शोधून काढली आहे. शिक्षण विभागाच्या जाचातून सुटण्यासाठी हा पर्याय शोधण्यात आला असला असला तरी साक्षरता अभियानाचा मूळ उद्देश यातून साध्य होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘निशाणी डावा अंगठा’ चित्रपटाची प्रचिती
निरक्षर मिळत नसल्याने साक्षर लोकांनाच निरक्षर बनवून कशाप्रकारे साक्षरता अभियान राबविले जाते, हे विनोदी अंगाने ‘निशाणी डावा अंगठा’ या मराठी चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत यांनी ज्या प्रकारे साक्षरांना निरक्षर दाखवून अभियान यशस्वी केले, याचीच प्रचिती सध्या शहरातील शिक्षकांकडून केली जात आहे. त्यामुळे सर्वच शिक्षकांना हा चित्रपट डोळ्यासमोर येऊ लागला आहे.