For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्यटनस्थळी मद्याच्या बाटल्या,5 हजार ते 50 हजारपर्यंत दंड

12:46 PM Aug 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
पर्यटनस्थळी मद्याच्या बाटल्या 5 हजार ते 50 हजारपर्यंत दंड
Advertisement

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचा इशारा

Advertisement

पणजी : समुद्रकिनारी किंवा इतर कोणत्याही पर्यटनाच्या ठिकाणी मद्याच्या बाटल्या टाकल्यास कायद्यातील तरतुदीनुसार रु. 5 हजार ते 50 हजारपर्यंतचा दंड करणार असल्याचा इशारा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिला आहे. राज्य विधानसभेत आमदार मायकल लोबो यांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. त्याशिवाय पर्यटकांची जनजागृती करुन त्यांना शिस्त लावण्यासाठी समुद्रकिनारी आणि इतर पर्यटनस्थळी सूचना फलक लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोबो यांनी पर्यटक गोव्यात येतात आणि ते समुद्रकिनारी मद्याच्या बाटल्या टाकून देतात. त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही, असे निदर्शनास आणले. गेली अनेक वर्षे हा प्रकार चालू असून त्यावर काहीतरी उपाययोजना करावी, अशी सूचना लोबो यांनी केली. समुद्रकिनारी मद्याच्या व इतर बाटल्या नेण्यास बंदी घालावी तसेच 50 मिटर्सच्या क्षेत्रफळात असलेली मद्याची दुकाने बंद करावी. पर्यटकांना शिस्त लागावी म्हणून सरकारने काहीतरी पावले उचलताना दंडात्मक कारवाई सुरु करावी, अशी मागणी लोबो यांनी केली.

पर्यटकांत जागृती महत्त्वाची : मुख्यमंत्री

Advertisement

त्यावेळी चर्चेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप केला आणि सांगितले की, पर्यटकांत जागृती होणे महत्त्वाचे असून फक्त दंड करीत बसले तर पोलिस छळतात म्हणून तक्रारी येतील. मद्याची दुकाने बंद करता येणार नाहीत कारण त्यात गोमंतकीय आहेत. त्यांचा व्यवसाय बंद पडेल. काचेच्या बाटल्याऐवजी कॅन किंवा इतर प्लास्टिक बाटल्या किनारी नेण्यावर सरकार विचार करेल, असे डॉ. सावंत म्हणाले.

पर्यटकांच्या जागृतीसाठी फलक लावणार : रोहन खंवटे

समुद्रकिनारी बाटल्या फोडणे, दंगामस्ती करणे हा प्रकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे सार्वजनिक शांतताभंग असून त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करणार, असे निवेदन खंवटे यांनी केले. लोबो यांनी उपस्थित केलेला विषय महत्त्वाचा असून त्यावर तोडगा काढणार आहे. मद्याच्या रिकाम्या बाटल्या दुकानात डिपॉझिट करण्याची योजना मागे आखण्यात आली होती. ती कार्यान्वित करण्याबाबत विचार करतो तसेच पर्यटकांच्या जागृतीसाठी हिंदी, इंग्रजी फलक लावतो, असे आश्वासन खंवटे यांनी दिले. विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी, दंडाची रक्कम वाढवावी अशी मागणी केली तर आमदार व्हेन्झी व्हिएगश यांनी पर्यटनाच्या विविध कार्यक्रमांत जागृती करावी, असे सुचवले. आमदार विजय सरदेसाई यांनी समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी नेमलेल्या कंपनीबाबतची माहिती विचारली आणि ती खंवटे यांनी दिली.

Advertisement
Tags :

.