शेतकऱ्यांच्या जमिनीला ‘आधार’ची जोडणी
कामाला वेग : तलाठी घरोघरी : जमीन विक्रीतील गैरकारभाराला बसणार आळा
बेळगाव : शेतजमीन (सातबारा) उताऱ्याला आधार लिंक करण्याच्या कामाला वेग आला आहे. पॅन कार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक, गॅस कनेक्शन याबरोबर आता सातबारा उताऱ्यालाही आधार लिंक केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीन फसवणुकीला आळा बसणार आहे. शासनाने हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून राबविला आहे. या उपक्रमाला शेतकऱ्यांचाही प्रतिसाद मिळू लागला आहे. शासन आणि कृषी खात्याकडून विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि संबंधित योजनेतील रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा व्हावी यासाठी आधार जोडणी सुरू आहे. त्याबरोबर खऱ्या शेतकऱ्यांची संख्याही समोर येणार आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बेकायदेशीर शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा शेतकऱ्यांनाही यामुळे चाप बसणार आहे. विशेषत: तलाठ्यांकडून घरोघरी जाऊन ही आधार जोडणी केली जात आहे.
आधार जोडणीचे शेतकऱ्यांना आवाहन
जिल्ह्यात 10 लाखाहून अधिक लहानमोठे शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या सातबाराला आधार जोडणी केली जाणार आहे. विशेषत: या आधार जोडणीमुळे जमीन विक्रीतील गैरकारभार कमी होणार आहेत. त्याबरोबर जमिनीचा मूळ मालक समजण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे ही आधार जोडणी महत्त्वाची असून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सातबारा उताऱ्यांना आधार जोडणी करून घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. शेती जमीनीला आधार जोडणी करण्याचे काम तलाठ्यांवर सोपविण्यात आले आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन केले जात आहे. संबंधित शेतकऱ्याच्या सर्व्हे नंबर, फोटो आणि ओटीपीही घेऊन जोडणी केली जात आहे.