एलआयसीचे बाजारमूल्य 7 लाख कोटींच्या घरात
पाचवी सर्वात मूल्यवान भारतीय कंपनी : एलआयसीचे समभाग 6 टक्क्यांनी वधारले
वृत्तसंस्था/ मुंबई
एलआयसीच्या समभागात 6 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, ज्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य 6.99 लाख कोटी रुपये झाले आहे. बाजारमूल्यामधील या वाढीमुळे एलआयसी भारतातील पाचवी सर्वात मूल्यवान कंपनी बनली आहे. देशातील मौल्यवान कंपन्यांच्या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आता एलआयसी यांचा समावेश आहे.
एलआयसीच्या बाजार भांडवलाने प्रथमच 7 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप 6.94 लाख कोटी रुपये आहे.
बुधवारी चालू आर्थिक वर्षातील ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते.
समभाग 52 आठवड्यांच्या नवीन उच्च पातळीवर
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या समभागाची किंमत शुक्रवारी सकाळच्या व्यवहारात 5 टक्क्यांहून अधिक वाढून 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचली. एलआयसीच्या समभागाचे भाव सातत्याने वाढत आहेत. कंपनीच्या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींच्या सकारात्मक प्रतिक्रीयेमुळे गुरुवारी प्रथमच एलआयसीने 7 ट्रिलियन रुपयांचा टप्पा ओलांडला. याशिवाय, कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील उत्कृष्ट निकालांमुळेही समभागात वाढ झाली आहे. एलआयसीने 17 मे 2022 रोजी सूचीबद्ध झाल्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना 28 टक्क्यांहून अधिक उत्कृष्ट परतावा दिला आहे. एलआयसीच्या समभागाची किंमत आता 949 च्या आयपीओची किंमत बँडवरून 20 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.