गरीब कुटुंबातील महिलेला दर महिन्याला 8,500 रुपये देणार : राहुल गांधी
वृत्तसंस्था /जोधपूर
राजस्थानच्या जोधपूर येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी जाहीर सभेला संबोधित केले आहे. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी एका झटक्यात देशातील गरिबी संपवू असा दावा केला आहे. गरीब कुटुंबातील एका महिलेला दर महिन्याला 8,500 रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. मागील 10 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींनी जनतेला वेगवेगळी आश्वासने दिली. खात्यात जमा करण्याऐवजी मोदी सरकारने 15 लाख रुपये लोकांकडून काढून घेतले, शेतकरी, मजूर, युवा आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी काहीच केले नाही. मोदींनी मागील 10 वर्षांमध्ये निवडक लोकांना देशाचा पूर्ण निधी दिला असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात गेल्यावर एकच नाव दिसून येते. एअरपोर्ट अदानी, बिजली अदानी, मोदींनी संपूर्ण लाभ एका व्यक्तीला मिळवून दिला आहे. अदानीसंबंधी मी संसदेत बोलल्यावर माझे सदस्यत्वच काढून घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने मला पुन्हा संसदेचे सदस्यत्व प्रदान केले. प्रत्येक क्षेत्रात अदानीच का दिसतात अशी विचारणा मोदींना केली होती. तसेच अदानी आणि मोदी यांच्यात नेमकं काय नातं आहे असे विचारले होते. यानंतर माझे सदस्यत्व रद्द करण्यात आले, माझे निवासस्थान काढून घेण्यात आले. यानंतर मी गप्प बसेन असे त्यांना वाटले होते. परंतु मला निवासस्थान नको, कारण हिंदुस्थानात माझी कोट्यावधी घरं आहेत असे उद्गार राहुल गांधी यांनी काढले आहेत.
गरीब कुटुंबाच्या महिलेला मदत
देशातील प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला आम्ही सत्तेवर आल्यावर वर्षाकाठी 1 एक लाख रुपये देणार आहोत. दर महिन्याला 8500 रुपये सरकार या महिलेच्या बँक खात्यात जमा करणार आहे. दारिद्र्यारेषेखाली असलेल्या कुटुंबाच्या बँक खात्यात दर महिन्याला 8500 रुपये जमा होत राहतील. आम्ही एका झटक्यात देशातून गरीबी संपविणार आहोत. ही काँग्रेसची गॅरंटी आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
कंत्राटी प्रथा बंद करणार
काँग्रेस सत्तेवर आल्यास देशात कंत्राटी प्रथा बंद केली जाणार आहे. म्हणजेच आतापर्यंत जी कामे सरकारमध्ये कंत्राटी स्वरुपात केली जात होती, ती कामे करण्यासाठी स्थायी कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या लोकांकडून काम करवून घेतले जाईल आणि त्यांचे भविष्यही सुरक्षित ठेवू असे राहुल गांधींनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी अग्निवीर योजना बंद करण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे.