leopard attack | घुणकीत बिबट्याचा हल्ला; मेंढपाळाच्या घोड्याच्या पिल्लाचा मृत्यू
हातकणंगले तालुक्यात बिबट्याची दहशत
घुणकी- हातकणंगले तालुक्यातील घुणकी इथल्या रविंद्र रंगराव सिद या मेंढपाळाचे घोड्याचे पिल्लू म्हणजेच शिंगरू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. हि घटना शनिवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली या घटनेमुळे मेंढपाळाचे सुमारे ३० हजार रुपयाचे नुकसान झाले. या घटनेमुळे बिबट्याने गेल्या एक वर्षापासून घुणकी परिसरात तळ मारल्याचे सिद्ध झाले आहे. या बिबट्याने या परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांच्या वर हल्ला केला आहे. वनविभागाने सापळा लावला आहे पण हा बिबट्या चतुर असल्याने तो सापळ्यात सापडलेला नाही. पण वन विभागाने पर्यायी व्यवस्था सुद्धा केली नाही. बिबट्याकडून भर वस्तीत घुसून पाळीव प्राण्यांच्या वर हल्ला होत असताना वन विभाग बिबट्याने माणसांच्या वर हल्ला करण्याची वाट पाहत आहेत काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि घुणकी मेंढपाळ रवींद्र सिद, काशिनाथ नांगरे, नितीन गावडे, कृष्णा डांगे, या मेंढपाळांच्या सुमारे ४०० मेंढरांचा कळप खतासाठी भिकाजी तुकाराम सिद्ध यांच्या गट क्रमांक 446 या शेतात बसायला आहेत. हा गट क्रमांक शेतातील नागरी वस्तीत आहे.
शनिवार दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सातच्या दरम्यान रवींद्र सिद यांचा घोडा आणि त्याचे शिंगरू चरत असताना बिबट्याने मेंढरांच्या कळपाशेजारी असणाऱ्या घोड्याच्या पिल्लावर हल्ला केला. त्याचे मुंडके बिबट्याने पकडल्यानंतर संबंधित मेंढपाळाने आरडाओरडा केल्याने बिबट्याने शिंगरू टाकून उसामध्ये धूम ठोकली. या हल्ल्यात शिंगरू जागीच ठार झाले. हल्याची घटना रवींद्र सिद काशिनाथ सिद यांनी तातडीने यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, यांना कळवली. संजय वाघमोडे यांनी हि घटना तात्काळ वनपाल कुलदीप कांबळे,आणि वनरक्षक श्रध्दा सोनटक्के यांना कळवून घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली. वनरक्षक श्रद्धा सोनटक्के यांनी घटनास्थळी रात्री भेट देऊन घटना स्थळांची पाहणी केली
आज रविवार ५ एप्रिल रोजी वनपाल कुलदीप कांबळे, वनरक्षक श्रद्धा सोनटक्के, वन सेवक संतोष बिरांगळे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून घटना स्थळाचा पंचनामा केला. डाॅ. वाळवेकर, व डॉ अंकुश तुराई पशुधन पर्यवेक्षक, यांनी मृत शिंगरू चे शवविच्छेदन केले.
घुणकी परिसरात बिबट्याची एक वर्षभरापासून दहशत निर्माण झाली आहे बिबट्याने अनेक वेळा शेतकरी मेंढपाळ यांच्या पाळीव प्राण्यावर हल्ले करून ठार मारले आहे. बाजारभावाप्रमाणे मेंढपाळ व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी. तसेच शासनाने प्राणी सुरक्षा कायदा रद्द करावा. वनविभागाने मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा तात्काळ बिबट्याला पकडून जंगलात सोडावे.अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मेंढपाळ चराई करून समितीचे राज्यपाल नियुक्त सदस्य संजय वाघमोडे यांनी केली.
घटना स्थळी भिमराव गावडे, काशिनाथ सिद बिरु सिद, बंडा सिद्, सुखदेव सिद, राहुल सिद सुभाष सिद, संजय सलगर, भिकाजी सिद, चंद्रकांत तेली, पोलीस पाटील यांच्यासह शेतकरी मेंढपाळ उपस्थित होते.