For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Politics | विधान परिषद, निवडणूक की बिनविरोध आज फैसला

01:56 PM Jun 04, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur politics   विधान परिषद  निवडणूक की बिनविरोध आज फैसला
Advertisement

विधान परिषद निवडणुकीत भाजप मतदारांची संख्या जास्त

Advertisement

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीत भाजप मतदारांची संख्या जास्त असल्याने या निवडणुकीची फारशी चर्चा होणार नाही असेच चित्र सुरुवातीला होते. परंतु महायुतीमधील मित्र पक्षांसह अपक्षांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले. तर काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला.

भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने निवडणूक लागणार की बिनविरोध भाजपचा उमेदवार विधानभवनात जाणार याचा फैसला होणार आहे.

तब्बल १० वर्षांनंतर विधान परिषद निवडणूक होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने विधान परिषद निवडणूकही होऊ शकली नव्हती. गेल्या काही महिन्यांपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य हे विधान परिषद निवडणुकीतील मतदार असणार आहेत.

Advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे मतदार जास्त आहेत. त्यामुळे ही निवडणूक भाजपला एकतर्फी असणार असेच चित्र प्रारंभापासून होते. महाविकास आघाडीकडून सोलापूरची जागा काँग्रेसला सुटली आहे. काँग्रेसकडून आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी देण्यात आली.

त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र छाननी दरम्यान मोठा ट्विस्ट निर्माण झाला. काँग्रेस उमेदवाराच्या अर्जावर सूचक म्हणून सही केलेल्या नागेश भोसले यांनी ही सही माझी नाही म्हणत छाननीवेळी प्रतिज्ञापत्रच सादर केले. विशेष म्हणजे नागेश भोसले हे भाजप कार्यकर्त्यांसोबतच प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आल्याने एकच गोंधळ उडाला होता.

काँग्रेस उमेदवाराचा अर्ज यामुळे छाननीत बाद झाला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांसमोरच घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर खा. प्रणिती शिंदे यांना फोन करून बोलावण्यात आले. त्यांनी तडक जिल्हाधिकारी यांचे दालन गाठले. जिल्हाधिकारी यांना त्यांनी याबाबत कोर्टात जाण्याचे सूचित केले.

काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने महाविकास आघाडीचा उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणातून बाद झाला. दरम्यान या घटनेनंतर बुधवारी अकलूज येथे महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली. उमेदवारी दाखल केलेल्यांपैकी एका अपक्ष उमेदवाराला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून पुरस्कृत करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सध्या ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता भाजपकडून या सातही उमेदवारांना अर्ज मागे घेण्याविषयी गळ घालण्याचे काम सुरू आहे. सात पैकी ५ उमेदवार अर्ज माघारी घेण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.