पेपर लीक केल्यास झारखंडमध्ये जन्मठेप होणार
10 कोटीपर्यंतचा दंड : नव्या कायद्याला राज्यपालांची मंजुरी
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक होण्यापासून रोखण्यासाठी कठोर कायदा लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑगस्ट महिन्यात विधानसभेतून संमत विधेयकाला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे. राज्य सरकारकडून अधिसूचना जारी होताच हे विधेयक कायद्याचे स्वरुप घेणार आहे. या कायद्यात स्पर्धा परीक्षाचे पेपर लीक केल्यास किमान 10 वर्षे आणि कमाल जन्मठेपेची तरतूद आहे. तसेच 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यासारखी कठोर तरतूद कायद्यात सामील आहे.
झारखंड प्रतियोगी परीक्षा (भरतीत अनुचित साधनांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना) अधिनियम 2023 असे या कायद्याचे नाव आहे. स्पर्धा परीक्षेत एखादा उमेदवार पहिल्यांदा कॉपी करताना पकडला गेल्यास त्याला एक वर्षाचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
स्पर्धा परीक्षेत दुसऱ्यांदा कॉपी करताना पकडला गेल्यास तीन वर्षांची शिक्षा तसेच 10 लाख रुपयांची दंडाची तरतूद आहे. न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आल्यावर संबंधिताला 10 वर्षांपर्यंत कुठल्याही स्पर्धा परीक्षेत भाग घेता येणार नाही. पेपर लीक आणि कॉपीशी निगडित प्रकरणांमध्ये प्रारंभिक तपासाशिवाय एफआयआर आणि अटकेची देखील तरतूद करण्यात आली आहे.
पेपर लीक आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षांविषयी भ्रम निर्माण करणारी माहिती प्रसारित करण्याचे कृत्यही या कायद्याच्या कक्षेत येणार आहे. हा कायदा राज्य लोकसेवा आयोग, राज्य कर्मचारी निवड आयोग, भरती संस्था, महामंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आयोजित होणाऱ्या भरती परीक्षांमध्ये लागू होणार आहे.