गेंधळी गल्लीत नळाला गळती : पाणी वाया, एलअँडटीचे दुर्लक्ष
बेळगाव : पाणी टंचाईच्या काळात देखील शहरात पाणी गळतीची समस्या कायम आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. गोंधळी गल्ली येथील नळामधून पाण्याचा अपव्यय सुरू असल्याचे दिसत आहे. एकीकडे पाण्यासाठी धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र नळ आणि जलवाहिनी फुटून पाणी वाया जाऊ लागले आहे. मनपा आणि एलअँडटी कंपनी याकडे गांभीर्याने लक्ष देणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. नदी, नाले व जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप व हिडकल जलाशयांची पाणी पातळी खाली येऊ लागली आहे. त्यामुळे शहरात आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. तर विविध ठिकाणी पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. दररोज कुठे ना कुठे जलवाहिनी किंवा नळातून पाणी वाया जाऊ लागले आहे. एलअँडटी कंपनीने पाणी जपून वापरावे, असा संदेश दिला आहे. शहरात विकासासाठी खोदण्यात आलेल्या ख•dयातून जलवाहिनींना गळती लागू लागली आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वाढत्या उन्हाबरोबर पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मात्र दुसरीकडे सार्वजनिक नळ आणि वैयक्तिक नळातून पाणी वाया जाताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि एलअँडटी कंपनीने जलवाहिन्या आणि नळांची वेळेत दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी होत आहे.