Sangali News : जत शहराच्या मुख्य पाईपलाईनलाच लागली गळती!
03:47 PM Apr 05, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
पाईपलाईनच्या गळतीकडे प्रशासनकडून दुर्लक्ष
Advertisement
जत : गळती गेल्या महिनाभरापासून सुरू असूनही पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. एकीकडे शहरात दहा दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत असताना, दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जत शहराला बिरनाळ तलावातून पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो. सुमारे पन्नास हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात कापसे वस्तीजवळील मुख्य पाईपलाईनला मोठी गळती लागली असून, तब्बल तीन एचपी क्षमतेइतके पाणी सतत वाहून जात आहे.
याशिवाय शहरातील विविध भागांमध्ये पाईपलाईन फुटल्याच्या घटनाही समोर येत आहेत. परिणामी, अनेक ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असून साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.
जत शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर होणारी ही नासाडी तातडीने थांबवून गळती दुरुस्त करणे अत्यावश्यक असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
शिवाय अनेक सुजाण लोक रोज इथून बिरनाळ तलावात पोहण्यासाठी जातात. रोज पालिकेला लाखोली होतात पण तक्रार करण्यास कोणीही धजावत नाही.