"धर्मेंद्र प्रधान यांना हटवा किंवा"...राहुल गांधी NEET पेपरफुटीवर आक्रमक
Rahul Gandhi on NEET Paper leak | सध्या देशभरात NEET परीक्षा पेपरफुटीवर वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. सुरुवातीपासून या मुद्द्यावर सरकारला घेरणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारवर आपला हल्ला अधिक तीव्र केला आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी केली.
'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, २२ लाख नीट विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला आहे आणि या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी पंतप्रधानांना एकतर धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ पदावरून हटवण्यास किंवा स्वतः याची जबाबदारी घेण्यास सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (पदवीपूर्व) ३ मे रोजी नियोजित होती, परंतु परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेमुळे ती रद्द करण्यात आली, ज्यामुळे देशभरात हिंसक आंदोलने झाली. सरकारने २१ जून रोजी फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, २२ लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी दोन वर्षे रात्रंदिवस मेहनत घेतली, पण त्यांची सगळी मेहनत वाया गेली. त्यांनी आरोप केला की, "संपूर्ण देशाला माहीत आहे की, परीक्षेच्या दोन दिवस आधी नीटचा पेपर व्हॉट्सॲपवर वितरित करण्यात आला होता."
राहुल गांधी यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही या वादाची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "भारताचे शिक्षणमंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान म्हणतात की, माझा याच्याशी काहीही संबंध नाही. एका समितीने शिफारस केली होती, पण त्यांनी ती कचरापेटीत टाकली. ते म्हणाले की, त्या समितीत विरोधी पक्षाचे लोक बसले आहेत, त्याला काही अर्थ नाही, त्याची गरज नाही."

भारताची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली
राहुल गांधींनी असा आरोप केला आहे की, आरएसएस, भाजप आणि विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने देशाच्या शिक्षण व्यवस्थेचे नुकसान केले आहे. "खरं सांगायचं तर, तुम्ही भारताचा पायाच उद्ध्वस्त केला आहे," असे राहुल गांधी म्हणाले. "हे एक संगनमत आहे—आरएसएस, भाजप आणि आपल्या विद्यापीठांमधील त्यांचे मित्रपक्ष: कुलगुरू आणि प्राध्यापक. त्यांची ही पैसा कमावण्याची साठगाठ आहे आणि त्यांनी भारताची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे."
राहुल गांधी यांनी असाही दावा केला की, कुलगुरूंच्या नियुक्त्या गुणवत्तेऐवजी वैचारिक संलग्नतेच्या आधारावर केल्या जात आहेत. त्यांनी आरोप केला, “संपूर्ण देशाला माहीत आहे की, कुलगुरू होण्यासाठी विषयज्ञान किंवा अनुभवाची गरज नसते. तुम्ही आरएसएसचे असाल, तर तुम्ही कुलगुरू होऊ शकता. पण जर तुमची विचारधारा आरएसएसची नसेल, तर तुम्ही कुलगुरू होऊ शकत नाही.”