बेंगळूर-कर्नाटक किनारपट्टीदरम्यान वंदे भारत सुरू करा
केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामींचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
बेंगळूर : बेंगळूर आणि राज्याच्या किनारी भागांमधील प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेसेवा सुरू करावी, अशी विनंती केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. या संदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहेत. बेंगळूर शहरापासून हासन-मंगळूर जंक्शन-उडुपी आणि कारवारमार्गे गोव्यातील मडगावपर्यंत हाय-स्पीड वंदे भारत रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी वंदे भारत रेल्वेसेवेला या भागात परवानगी दिल्यास किनारी भागातील लोकांना मोठा फायदा होणार आहे. विकासासाठी देखील अधिक अनुकूल ठरेल, असे म्हणत कुमारस्वामींनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. पश्चिम घाट प्रदेशासह या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यामुळे हाय-स्पीड रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा आता उपलब्ध आहेत, असे कुमारस्वामींनी पत्रात नमूद केले आहे.
कोणत्या मार्गावर धावणार रेल्वे?
हासन, मंगळूर जंक्शन, उडुपी आणि कारवारमार्गे गोव्यातील मडगावपर्यंत जोडणाऱ्या वंदे भारत रेल्वेसेवेमुळे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. यामुळे यात्रेकरूंना किनारी भागातील पवित्र ठिकाणी जाणे आणि येणे देखील सोपे होणार आहे. शैक्षणिक आणि व्यावसायिक कारणांसाठी या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल, असे मंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.