विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ
पणजी : दोनापावला-पणजी येथील विकसित भारत संकल्प यात्रेला आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी हिरवा कंदील दाखवून शुभारंभ केला. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार करणे आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ गोमंतकीय जनतेला मिळवून देणे हा यात्रेमागील हेतू असल्याचे राणे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत समाजातील दुर्बल, मागास घटकांसाठी कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आणि त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात आल्या. जनतेला त्याचा लाभ झाला. त्यामुळे सामान्य लोकांच्या जीवनमानात बदल घडल्याचा दावा राणे यांनी केला आहे. नगरविकास खाते संचालक गुरुदास पिळर्णकर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी केंद्राच्या विविध योजनांची माहिती देणारे पत्रक प्रकाशित करून त्याचे वितरण करण्यात आले. गोवा राज्यातील 11000 शेतकऱ्यांना किसान सन्मन योजनेचा फायदा मिळाला असून 9000 शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे. त्या कार्डाचा लाभ ते घेत आहेत. पंतप्रधान आवास (निवास) योजनेचा लाभ सुमारे 3000 लोकांनी घेतला असून अटल निवृत्ती योजनेअंतर्गत 86000 लोकांना निवृत्ती वेतन मिळते. आरोग्य उपचारासाठी चार लाख लोकांनी आभा कार्ड केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.