रेशनच्या तांदळाची वाहतूक करताना मोठ्या प्रमाणात नासाडी
ट्रकमधून नेताना शेकडो किलो तांदूळ वाया
बेळगाव : रेशनच्या तांदळाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून दररोज शेकडो किलो तांदूळ वाया जात असल्याचे चित्र वरचेवर दिसत आहे. ट्रकमधील फळ्यांमधून पोत्यातील तांदूळ थेट रस्त्यावर पडत आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी आणलेल्या तांदळाची अशाप्रकारे नासाडी होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. गरिबांना रेशनच्या माध्यमातून तांदळाचा पुरवठा केला जातो. बऱ्याचवेळा मालवाहू रेल्वेतून आलेला तांदूळ पोत्यांमधून गोडाऊनपर्यंत व तेथून रेशन दुकानापर्यंत पोहोचविला जातो. या वाहतुकीमध्ये मजुरांकडून पोती चढविताना व उतरविताना पोत्याला आकड्यामुळे छिद्र पडते व तेथून तांदूळ खाली पडत असतो. बेळगाव शहराच्या परिसरात संपूर्ण जिल्ह्याचा तांदूळ साठा येत असल्यामुळे वाहतूक करताना शेकडो किलो तांदूळ वाया जात आहे.
अन्न व नागरी पुरवठा खात्यानेही लक्ष देणे गरजेचे
एकीकडे खायला अन्न नसल्याने गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर दुसरीकडे तांदळाची नासाडी केली जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी वाहतूक कंत्राटदारांसोबतच अन्न व नागरी पुरवठा खात्यानेही लक्ष देणे गरजेचे आहे.