पश्चिम बंगालमध्ये मोठी निदर्शने
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी रात्री कायदा विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून राज्याच्या अनेक शहरांमध्ये मोठी निदर्शने आणि आंदोलन होत आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती पूर्णत: हाताबाहेर गेली असून महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे, असा आरोप अनेक आंदोलक संघटनांनी केला. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. तसेच पाच सदस्यांचे विषेश तपास दल स्थापन केले आहे.
गुरुवार आणि शुक्रवारच्या रात्री दक्षिण कोलकाता कायदा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींमध्ये राज्यात सत्ताधारी असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळल्याचे दिसून येत आहे. साधारणत: एक वर्षापूर्वी घडलेल्या महिला ड्रॅक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची आठवण पुन्हा करुन देणारे हे प्रकरण आहे.
राष्ट्रपती राजवट लागू करा
पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार कायदा सुव्यवस्था सांभाळ्यात सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे तेथील सरकारने राजीनामा द्यावा. सरकारने राजीनामा न दिल्यास केंद्र सरकारने त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पास्वान यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल शाखेनेही अशीच मागणी केली आहे. कायदा सुव्यवस्था परिस्थिती आता हाताबाहेर गेली असून राज्य सरकार स्वत:च गुन्हेगारांना, त्यांचे राजकीय महत्व ओळखून पाठीशी घालत असल्याने त्यांच्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. त्यामुळे या राज्य सरकारला हटविण्याची वेळ आता आली आहे, अशी भारतीय जनता पक्षाच्या राज्यशाखेचे अध्यक्ष सुकांतो मजूमदार यांनी केली.