काश्मीर, उत्तराखंडमध्ये भूस्खलनाच्या दुर्घटना
विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशभरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून बऱ्याच राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तींची नोंद झालेली आहे. जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये गुरुवारी भूस्खलनाच्या दुर्घटना घडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथील गौरीकुंडजवळ झालेल्या भूस्खलनामुळे केदारनाथ यात्रा सलग तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली आहे. डोंगराळ आणि मैदानी भागात सततच्या पावसामुळे हरिद्वारमध्ये गंगा नदीची पातळी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील अकचमलजवळ भूस्खलन झाल्याने कारगिल-लेह राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. वाहतूक थांबवण्यात आली आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे डोंगरावरून पडलेल्या एका मोठ्या दगडाखाली एक कार दबली गेली.
उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या स्याना चट्टी परिसरात रस्त्यावर एक मोठा दगड पडल्यामुळे त्याचा रहदारीवर परिणाम झाला आहे. आसाम गेल्या पंधरवड्यापासून महापुराचा सामना करत असून येथील पूरबळींचा आकडा आता शंभरीच्या घरात पोहोचला आहे. हवामान विभागाने गुरुवारी राजस्थानसह 16 राज्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि तेलंगणामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गंगा नदीचे पाणी आणायला गेलेल्या एका कावडयात्रेकरूला एसडीआरएफच्या पथकाने बुडण्यापासून वाचवले. उत्तर प्रदेशातील बलियामध्ये सरयू नदीची धूप तीव्र झाली असून, पाणी गावांमध्ये शिरत आहे. गोंडामधील घाघरा नदीची पातळी कमी झाल्याने धूप आणखी वाढली आहे. येथेही अनेक लोकांना परिणामांना सामोरे जावे लागत आहे.