पार्किंग टर्मिनलसाठी जमिनी घेऊ नये
भू-संपादनाची प्रक्रिया रद्द करा : अगसगे-कडोलीतील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : रिंगरोडला लागूनच पार्किंग टर्मिनल उभारण्यासाठी अगसगे व कडोली परिसरातील जमिनी ताब्यात घेऊ नयेत, अशा आशयाचे निवेदन या परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भूस्वाधीन अधिकाऱ्यांना दिले आहे. नियोजित रिंगरोड अगसगे व कडोलीवरून जातो. यासाठी अतिरिक्त भूसंपादन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. खासकरून रिंगरोडला लागूनच पार्किंग टर्मिनल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. खरेतर मूळ योजनेत ही तरतूदच नव्हती. कोणत्याही प्रकारची नोटीसही प्राधिकरणाने शेतकऱ्यांना दिली नाही. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
अचानक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रिंगरोडचा नकाशा बदलून कृषी जमिनीवर पार्किंग टर्मिनल उभारण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. रिंगरोडसाठी सुपीक जमिनी दिल्या आहेत. आता उर्वरित जमिनीही पार्किंग टर्मिनलसाठी ताब्यात घेतल्या तर शेतकरी रस्त्यावर येणार आहे. म्हणून भू-संपादनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मदन पावले, महेंद्र नार्वेकर, नंदू चेलवेटकर, इराप्पा चलवेटकर, मल्लाप्पा पावले, सातेरी चलवेटकर आदींसह परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.