नंदगड ग्रा. पं.च्या कचऱ्यामुळे तलावाचे पाणी दूषित
जनावरांच्या जीवाला धोका, पिकांचे नुकसान
वार्ताहर/हलशी
नंदगड-हलशी रस्त्याच्या शेजारी चन्नेवाडी तलावाच्या वरील बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी मारलेल्या चरीमध्ये नंदगड ग्राम पंचायतीने कचरा टाकल्याने चरीतून पाणी तलावात मिसळत आहे. शेतीसाठी तसेच गुरांना पिण्यासाठी तलावातील पाणी वापरले जाते, या कचऱ्यातून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या तसेच पाण्यात न विरघळणारे घटक येत असल्याने गुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शेतीला जाणाऱ्या पाण्यातून प्लास्टिक कचरा जात असल्याने भात पिकाचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. हा प्लास्टिक कचरा तलावात जात असल्याने तेथे गाळ साचत आहे. तसेच डोंगराळ भागातून येणारे पाणी घनकचरा अडकल्याने रस्त्यावरसुद्धा पाणी तुंबत आहे. तरी नंदगड ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन कचरा रस्त्याच्या बाजूला न टाकता आपल्या नियोजित जागेवर टाकावा, अशी मागणी चन्नेवाडी ग्रामस्थांतून होत आहे.