कुप्पटगिरी रस्त्यावरील पुलाला भगदाड : वाहतुकीस धोकादायक
खानापूर : कुप्पटगिरी संपर्क रस्त्यावर असलेल्या नल्यावरील पुलाला भगदाड पडल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. या पुलाची तातडीने तात्पुरती डागडुजी करण्यात यावी आणि वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी कुप्पटगिरी ग्रामस्थांनी केली आहे. खानापूर शहराला लागून असलेल्या कुप्पटगिरी गावाला मलप्रभा नदीच्या बाजूने कुप्पटगिरीसाठी जुना संपर्क रस्ता आहे. या रस्त्यावरील नाल्यावर छोटा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल फार जुना आहे. गेल्या काही वर्षापासून हा पूल कमकुवत झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी जि. पं. कार्यालयात जाऊन निवेदन दिले होते. मात्र याबाबत जि. पं.च्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही.
त्यामुळे ग्रामस्थांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन पुलाबाबत निवेदन दिले होते. आमदार विठ्ठल हलगेकर आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी या पुलाची दोनदा पाहणी करून आपण तातडीने या पुलाच्या दुऊस्तीसाठी जि. पं. अधिकाऱ्यांना आदेश देऊ, असे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सांगितले होते. मात्र या पावसाळ्यापूर्वी पुलाची काहीही डागडुजी केलेली नाही. नुकत्याच सुरू झालेल्या पावसाने या पुलाच्या मधोमध मोठे भगदाड पडले असून या पुलावरून आता वाहतूक करणे पूर्ण धोक्याचे बनले आहे. कुपटगिरी येथे दूध डेअरी असल्याने खानापूर शहर तसेच इतर ठिकाणाहून लोक दूध देण्यासाठी येत असतात. तरी पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी होत आहे. तसेच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी निधी मंजूर करावा तसेच नव्याने बांधण्यात येणारे पूल उंच करून बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे