कोकणात पावसाळी वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली
कोकणातील काही भागात पावसाची हजेरी, राज्यात चक्राकार वाऱ्याची निर्मिती
रत्नागिरी : मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे पुढील 3 ते चार दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. कोकणात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. गेले दोन दिवस वातावरण ढगाळ आहे. वादळी वातावरणाच्या प्रभावामुळे कोकणातील येथील आंबा-काजू बागायतदार चिंतातूर झाले आहेत.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याचा फटका खेड तालुक्यातील खोपीफाटा येथील पाच दुकानांना फटका बसला. तसेच एका गाळ्यावरील पत्रे उडून आलिशान कारचेही नुकसान झाले. राज्याच्या अनेक भागात प्रचंड वाढलेले तापमान पाहता काही ठिकाणी 38 ते 37 तर 41 अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेलं आहे. मात्र दुसरीकडे हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिह्यांना वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे राज्यात उन्हाचा कडाका देखील वाढला आहे. गारपीट, पाऊस आणि वाढतं तापमान असं तिहेरी संकट सध्या राज्यावर आहे. कोकण पट्टीदेखील या वातावरणाच्या प्रभावाखाली आली आहे. अनेक भागात वादळी तर तुरळक पावसाच्या सरींचा गेल्dया दोन दिवसांपासून शिडकावा होताना दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात गेले दोन दिवस पावसाच्या तुरळक सरींचा झाला.
खेडमध्ये वादळी वाऱ्याचा 5 दुकान गाळ्यांना फटका
खेड : तालुक्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याचा खोपीफाटा येथील पाच दुकानांना फटका बसला. एका गाळ्यावरील पत्रे उडून आलिशान कारचेही नुकसान झाले आहे. पावसाच्या शिडकाव्याने नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली.
दापोलीत वीज पुरवठा खंडीत
दापोली : शहरातील 33 केव्हीतून वीज पुरवठा करणारी केबल तुटल्याने मंगळवारी रात्री काही तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. 33 केव्हीतून दापोली व हर्णै येथे दोन वीजवाहिन्या वीज पुरवठा करतात. मंगळवारी सायंकाळी वाऱ्याचा वेग वाढला होता. यात दापोलीला वीजपुरवठा करणारी वाहिनी तुटली.
यामुळे काही तास वीज पुरवठा खंडीत झाला. याच दरम्यान वीज वाहिन्यांच्या लगत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. तात्पुरत्या स्वरुपात मंगळवारी रात्री हर्णै वीजवाहिनीवर अतिरिक्त भार देवून सर्वत्र वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. तरी बुधवारी या तुटलेल्या वीजवाहिनीचे काम करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
चिपळुणात सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस
चिपळूण : सोमवारी मध्यरात्री कोसळलेल्या पावसानंतर मंगळवारीही शहर परिसरात पावसाने हजेरी लावली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारचा पाऊस अधिक असल्याने आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. या पावसामुळे कुठेही नुकसान झालेले नसले तरी या पावसाचा फटका आंबा, काजू फळपिकाला बसण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.
पावसामुळे या पिकावर कीड तसेच रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बागायतदारांनी बागेची नियमितपणे पाहणी करून कीड व रोगानिहाय फरवाणीच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी केले आहे.
गुहागरमध्ये तुरळक पाऊस
गुहागर : गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये तालुक्यातील काही गावांमध्ये तुरळक पाऊस पडत आहे. बुधवारी अडूर, पालशेत, वेळणेश्वर, काजुर्ली भागामध्ये पावसाचा शिडकावा झाला. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण होते. अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकावर कीड व रोग प्रादुर्भावाची शक्यता वर्तवण्यात येत असून पिकांची योग्य औषध फवारणी करुन काळजी घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी केले आहे.
आंबा, काजू पिकाची काळजी घेण्याचे आवाहन
मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणामध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तसेच पुढील 3 ते 4 दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे आंबा व काजू पिकाची काळजी घेण्याचे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
पावसाळी वातावरण कीड व रोग प्रादुर्भावासाठी अनुकूल आहे. या वातावरणामध्ये आंबा पिकावर फुलकिडी आणि फळमाशी या किडींचा तसेच करपा रोगाचा व काजू पिकावर ढेकण्या, फुलकीड आणि बोंडू व बी पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तरी आंबा आणि काजू बागयतदारांनी आपल्या बागेची नियमितपणे पाहणी करून कीड व रोगनिहाय उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे.