HSC Result 2025 : कोकणची पोरं हुश्शार! मंडळाला सलग 14 वर्षे ‘टॉपर’चा मान
बारावी परीक्षा निकाल 96.74 टक्के, गतवर्षीच्या तुलनेत 0.77 टक्के घट
रत्नागिरी : बारावी परीक्षा निकालात गुणवत्तेच्या जोरावर कोकणातील विद्यार्थ्यांनी सलग 14 व्या वर्षी महाराष्ट्रात बाजी मारत निकालातील अव्वल स्थान कायम राखले. बारावी परीक्षेत कोकण विभागीय मंडळाचा निकाल 96.74 टक्के लागला आहे. यामध्ये रत्नागिरीचा 95.67 टक्के तर सिंधुदुर्ग जिह्याचा 98.74 टक्के इतका निकाल लागला आहे. कोकण विभागाच्या निकालात यंदाही मुलीनी बाजी मारली. यावर्षी नेहमीपेक्षा खूपच लवकर निकाल लागला आहे. आता पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होणार आहे.
पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावीचा ऑनलाईन निकाल सोमवारी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. कोकण विभागीय मंडळाने गतवर्षीही राज्यात 12 वी परीक्षेत 97.51 टक्केवारी मिळवत राज्यात प्रथम क्रमांक राखला होता. यंदा सलग चौदाव्या वर्षी ही परंपरा कायम ठेवली.
कोकण विभागाच्या निकालात यंदाही मुलींनी 98.03 टक्केवारी प्राप्त करत बाजी मारली आहे. गतवर्षी 2024 मध्ये मुलींची टक्केवारी 97.41 इतकी होती. कोकण विभागात रत्नागिरीचा निकाल 95.67 टक्के तर सिंधुदुर्ग जिह्याचा 98.74 टक्के लागला आहे. कोकणच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश निर्विवाद असल्याचे कोकण बोर्डाचे सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात 243 कनिष्ठ महाविद्यालये आणि त्यांच्यासाठी एकूण 61 मुख्य परीक्षा केंद्रे होती. यात रत्नागिरीतील 38 तर सिंधुदुर्गातील 23 केंद्रांचा समावेश होता. दोन्ही जिह्यातील एकूण 23 हजार 563 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 22 हजार 797 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 15 हजार 297 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 14 हजार 635 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन हा निकाल 95.67 टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्dयात 8 हजार 266 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 8 हजार 162 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन हा निकाल 98.74 टक्के इतका लागला.
विज्ञान शाखेचा सर्वाधिक 98.16 टक्के निकाल
कोकण विभागाच्या शाखानिहाय निकालामध्ये विज्ञान शाखा 98.16 टक्के, कला शाखा 92.21 टक्के, वाणिज्य 98.06 टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा निकाल 97.13 टक्के आणि टेक्निकल सायन्स शाखेचा 92.13 टक्के इतका लागला आहे. विज्ञान शाखेतील 8,845 विद्यार्थ्यांपैकी 8,683 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेतील 5,135 विद्यार्थ्यांपैकी 4,735 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतील 8,646 विद्यार्थ्यांपैकी 8,479 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातील 733 विद्यार्थ्यांपैकी 712 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तर टेक्निकल सायन्सच्या 204 विद्यार्थ्यांपैकी 188 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
रत्नागिरी जिह्यातून विज्ञान शाखेमध्ये 5,664 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 5,517 विद्यार्थी (97.40 टक्के) उत्तीर्ण झाले. कला शाखेतील 3,477 विद्यार्थ्यांपैकी 3,141 विद्यार्थी (90.33) उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेमध्ये 5,696 विद्यार्थ्यांपैकी 5,542 विद्यार्थी (97.29) उत्तीर्ण झाले. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी 300 विद्यार्थ्यांपैकी 287 विद्यार्थी (92.50 टक्के) उत्तीर्ण झाले. टेक्निकल सायन्सच्या 160 विद्यार्थ्यांपैकी 148 विद्यार्थी (92.50) उत्तीर्ण झाले.
सिंधुदुर्ग जिह्यातून विज्ञान शाखेसाठी 3181 विद्यार्थ्यांपैकी 3,166 विद्यार्थी (99.52 टक्के) उत्तीर्ण झाले. कला शाखेसाठी 1658 विद्यार्थ्यांपैकी 1594 विद्यार्थी (96.13) उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेसाठी 2,950 विद्यार्थ्यांपैकी 2,937 विद्यार्थी (99.55) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यवसाय अभ्यासक्रमातून 433 विद्यार्थ्यांपैकी 425 विद्यार्थी (8.15) यशस्वी झाले. तर टेक्निकल सायन्समध्ये 44 विद्यार्थ्यांपैकी 40 विद्यार्थी (90.90) उत्तीर्ण झाले.
पुनर्परीक्षार्थी निकाल 50.34 टक्के
यावर्षी कोकण बोर्डात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून पुनर्परीक्षार्थी 294 विद्यार्थ्यांपैकी 148 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल 50.34 टक्के लागला आहे. गतवर्षी 2024 मध्ये हा निकाल 80.30 टक्के लागला होता.
सलग 14 वर्षे निकालात आघाडी कायम
2012 साली कोल्हापूर केंद्रातून स्वतंत्र करण्यात आलेल्या कोकण विभागीय मंडळाचा 2012 साली 86.25 टक्के, 2013 साली 85.88 टक्के, 2014 साली 94.85 टक्के, 2015 साली 95.68 टक्के, 2016 साली 93.29 टक्के, 2017 साली 95.20 टक्के, तर 2018 साली 94.85 टक्के, 2019 मध्ये 93.23 टक्के, 2020 मध्ये 95.89 टक्के प्राप्त करत राज्यात अव्वल टक्केवारी राहिली होती. 2021 मध्ये या निकालात 99.81 टक्के इतकी वाढ झालेली होती.
2022 मध्ये हा निकाल 97.21 टक्के इतका लागला होता. 2023 मध्ये 96.01 टक्के निकाल लागला होता. गतवर्षी 2024 मध्ये 97.51 टक्के इतका लागला होता. आणि आता 2025 मध्ये 96.74 टक्के लागला आहे. जरी या निकालात चढ-उतार होत असला तरी कोकण बोर्ड राज्यात निकालात अव्वल येत सलग 14 वर्ष राखलेले सातत्य राखून आहे. या परीक्षेदरम्यान यावर्षी कोकण बोर्डात केवळ 2 गैरप्रकार आढळून आले.
त्यामध्ये एका मुलाने उत्तरपत्रिकेचे एक पान अनावधानाने फाडल्याची बाब समोर आली होती. गतवर्षी 2024 मध्ये ही गैरप्रकारांची संख्या 9 इतकी होती. या परीक्षेसाठी शिक्षा सूचीचा वापर केल्यामुळे कॉपीमुक्त अभियान यशस्वी होण्यास मदत झाल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह त्यांचे शिक्षक, पालक यांचेही योगदान महत्वपूर्ण असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत 0.77 टक्के घट
बारावी परीक्षेत 2019 मध्ये 93.23 टक्के निकाल लागून कोकण विभागाची 1.62 टक्के निकालात घट झाली होती. पण 2020 मध्ये 95.89 टक्के निकाल लागला आणि त्यात 2.66 टक्के वाढ झाली होती. 2021 मध्ये 99.81 टक्के लागला होता. 2022 मध्ये 97.21 टक्के इतका लागला होता.
पण 2023 मध्ये लागलेल्या निकालात 2022 च्या तुलनेत 1.20 टक्के इतकी घट होत हा निकाल 96.01 टक्के इतका लागला होता. गतवर्षी 2024 मध्ये 97.51 टक्के निकाल लागून मागील वर्षीच्या तुलनेत 1.5 टक्के इतकी वाढ झाली होती. मात्र यावर्षी 2025 मध्ये हा निकाल 96.74 टक्के लागला आहे. पण गतवर्षीच्या 2024 तुलनेत निकालात 0.77 टक्के इतकी घट झाली आहे.
कोकण विभागात यावर्षीही मुलींनी मारली बाजी
कोकण विभागात यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी कोकण विभागातून एकूण 11,956 मुलांपैकी 11418 मुलगे (95.50 टक्के) उत्तीर्ण झाले. गतवर्षी ही टक्केवारी 94.42 टक्के इतकी होती. तर एकूण 11,607 मुलींपैकी 11,379 मुली (98.03 टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. गतवर्षी 2024 मध्ये मुलींची उत्तीर्णतेची ही टक्केवारी 98.60 टक्के इतकी होती.
यावर्षी मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 2.53 टक्के अधिक आहे. गतवर्षी मुलींचे उत्तीर्णतेचे हे प्रमाण मुलांपेक्षा 2.18 टक्के इतके होते. त्यामुळे मुलांपेक्षा अधिक टक्केवारी मिळवत यावर्षी 2025 मध्येही मुलींनी यशस्वीतेत अव्वल स्थान कायम राखले आहे.
उत्तरपत्रिकांची छायाप्रत/ गुणपडताळणी ऑनलाईन कार्यवाही आजपासून
ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांस स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत व पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून http://mahahsscboard.in/ स्वत: किंवा शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध कऊन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी मंगळवार 6 मे ते मंगळवार 20 मे 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतील. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking ) याद्वारे भरता येईल.
उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन
उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून या विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्याने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी या विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी प्रथमच डिजी लॉकर सुविधा
यावेळेस प्रथमच विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळामार्फत डिजी लॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल पाहता येणार आहे, तर परीक्षा प्रमाणपत्र डिजी लॉकरमध्ये कायमस्वरुपी ठेवता येणार आहे.
श्रेणी/गुण सुधार योजनेतर्गंत यावेळेस तीन संधी
सर्व विषयांसह प्रविष्ठ होवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून, जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 व जून-जुलै 2026) श्रेणी/ गुण सुधार योजना योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील असे सांगण्यात आले आहे.
पुरवणी परीक्षा आवेदनपत्रे
जून, जुलै 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्था व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी 7 मे 2025 पासून मंडळाच्या संकेतस्थळावऊन ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भऊन घेण्यात येणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
कोकण बोर्डाने इतिहास रचलाय...आता स्पर्धा परीक्षांकडे गांभीर्याने पहा
"2012 साली स्थापन झालेल्या कोकण बोर्डने मार्च 2025 च्या परीक्षेत 96.74 टक्के गुण मिळवून राज्यातील 9 विभागात प्रथम क्रमांक मिळवला. सातत्याने सर्वाधिक निकाल लावण्याची परंपरा कोकण बोर्डाने कायम राखली आहे. या बोर्डसाठी आंदोलनात चार पाऊल टाकता आली, याचा मला आनंद आहे. सातत्याने शिखरावर राहणे कौतुकास्पद व अभिनंदनीय. शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या सामूहिक प्रयत्नाचे यश आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, योग्य सराव, नियोजन व परस्पर संवाद यामुळे कोकण पॅटर्नने महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर आपले नाव अधोरेखित करून इतिहास निर्माण केला आहे. कोकण बोर्डमुळे कोकणाच्या विद्यार्थ्यांना मोकळा श्वास घेवून स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व राखता आले. परंतु कोकणातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आपल्या मुलांनी अवकाश तंत्रज्ञानात चांद्रयानाच्या दिशेने प्रवास केला पाहिजे. तसेच नव्या मुंबईत येणाऱ्या परदेशी विद्यापीठाचे आव्हान आत्मविश्वासाने पेलले पाहिजे व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या तंत्रज्ञानाची भाषा अवगत करून नव्या युगाच्या नव्या वाटा दमदारपणे चोखाळल्या पाहिजेत, असे मत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी व्यक्त केले."
- सुभाष चौगुले
राज्यात अव्वल निकालाची परंपरा कायम
गेली 14 वर्षे कोकण परीक्षा मंडळाने निश्चितपणे 12 वीच्या परीक्षेत राज्यात अव्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावेळेस कोकण बोर्डाचा या परीक्षेचा निकाल 97.51 टक्के इतका लागला आहे. ही साऱ्या कोकणवासियांच्या दृष्टीने अभिमानाची व कौतुकास्पद बाब ठरली आहे. या निकालात मुला-मुलींनी चांगले यश मिळवले आहे. मुलींनी निकालात घेतलेल्या भरारी कौतुकास्पद आहे.
राज्यात या परीक्षेत अव्वल येण्याचे हे सारे श्रेय परीक्षेचा अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, तज्ञ, शाळांचे मुख्याध्यापक, पालक व सर्व संस्थाचे संस्थाचालक, तसेच शिक्षण विभाग व अधिकारी वर्ग, जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा अशा सर्वांचेच हे सामूहिक प्रयत्नांचे यश आहे. तज्ञांचे मार्गदर्शन, योग्य सराव, नियोजन व परस्पर संवादामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर आपले नाव अधोरेखित केल्याचे कोकण विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी सांगितले.
जिल्ह्यातील 100 टक्के मिळवणारी कनिष्ठ महाविद्यालये :
- चिपळूण - 10
- खेड - 10
- रत्नागिरी - 9
- संगमेश्वर - 9
- राजापूर - 8
- दापोली - 5
- गुहागर - 3
- लांजा - 3
- मंडणगड - 1