For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Thet Pipeline: थेट पाईपलाईन दमलीये मग जुनी कुठे गेली?, शहरात महिलांचे संतप्त चित्र

06:01 PM Aug 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
kolhapur thet pipeline  थेट पाईपलाईन दमलीये मग जुनी कुठे गेली   शहरात महिलांचे संतप्त चित्र
Advertisement

आम्हाला नियमित पाणी द्या, इतकीच मागणी शहरातील महिला-भगिनी करत आहेत

Advertisement

By : संतोष पाटील

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना कार्यान्वित झाल्यापासून सलगपणे एक महिनाही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. 488 कोटी रुपयांची योजना शहरवासीयांच्या माथी मारली की काय? अशी वस्तूस्थिती आहे की, राजकारणामुळे ती केली जातेय? तेव्हा तुमचं प्रशासकीय धोरण आणि राजकारण गेलं चुलीत, आम्हाला नियमित पाणी द्या, इतकीच मागणी शहरातील महिला-भगिनी करत आहेत

Advertisement

दहा-बारा वर्षांच्या कासवछाप गतीनंतर काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना कार्यन्वित झाली. नंतर व्हॉल्वसह गळतीचे दुखण्याने डोकं वर काढले. तर कधी तांत्रिक बिघाड तर पाईपलाईन जोडकामामुळे पाणी पुरवठा बंद केला जातो. वेगाने वारे आणि थोडा जादाचा पाऊस झाला तरीही योजना बंद पडते.

इतकी मोठी योजना करताना या बारीक-सारीक गोष्टीचा विचार केला नसावा? हेच खरतरं आश्चर्य आहे. थेट पाईपलाईन आणि शिंगणापूर दोन्ही गरजेनुसार सुरू ठेवण्याचे नियोजन मात्र कागदावरच राहिले. सणाचे दिवस असताना तीन दिवसांपासून शहरातील बहुतांश भागात पाण्याचा गोंधळ सुरु आहे. कोल्हापूर शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा.

या उद्देशाने युआयडीएसएसएमटी अंतर्गत ऑक्टोबर 2010 मध्ये योजनेला राज्य सरकारची मंजुरी मिळाली. 423 कोटी रुपयांची योजना यांनतर निविदा प्रक्रियेत अडकली. 12 वर्षांनंतर ठेकेदाराला सुमारे साडेसात कोटींचा दंड होऊन योजना अखेर पूर्णत्वास गेली. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना ही शहरवासीयांचे मागील चार दशकांचे स्वप्न. मात्र, योजनेसाठी बक्कळ निधी असूनही दहा वर्षांत राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे कासवछाप झाली.

पाईपलाईन योजनेने राज्यात तीन वेळा सत्तांतराचा अनुभव घेतला. त्याच त्या घोषणा आणि दिरंगाईच्या कारणांमुळे काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना दहा वर्षांपासून कोल्हापूरचे राजकीय व सामाजिक स्वास्थ बिघडविणारी ठरली. योजना पूर्ण क्षमतेनं सुरू होऊ नये यासाठीही काही विघ्नसंतोषी पडद्यामागे काम करत असल्याचा संशय आहे. पर्यायी जुनी सक्षम यंत्रणा मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यामागे निव्वळ राजकीय प्रयोजन असल्याची चर्चा आहे.

राजकारण की प्रशासनाची अकार्यक्षमता?

शहरासाठी यापूर्वी शिंगणापूर येथून 100 दशलक्ष लिटर (एमएलडी), नागदेववाडी येथून 40 आणि बालिंगा येथून 60 एमएलडी पाण्याचा उपशा केला जात होता. शिंगणापूर केंद्रातील उपशा यंत्रणा बदलण्याचे काम प्रकियेत असल्याचे मागील दोन वर्षापासून सांगितले जाते.

काळम्मावाडी योजना काही कारणास्तव थोड्या अवधीसाठी बंद करावी लागली, तर पूर्वीप्रमाणे शिंगणापूर येथून उपशा करण्याचे प्रयोजन कागदावरच आहे. पर्यायी यंत्रणा जाणीवपूर्वक बंद ठेवली जात आहे का? असा संशय आहे. आमदार सतेज पाटील यांना थेट पाईपलाईनचे श्रेय जाते, योजना कशी खराब आहे हे दर्शवून शहरवासीयांच्या मनात चिड निर्माण करण्याचा राजकीय डाव नसेल तर पर्यायी सक्षम यंत्रणा इतकी दिवस बंद का ठेवली? हा प्रश्नही महत्वाचा आहे.

थेट पाईपलाईन शिंगणापूरच्या गळक्या योजनेच्या मार्गावर?

थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा कधीच खंडित होणार नाही, हे स्वप्न भंगले. 1998 साली गळती शिंगणापूर योजना माथी मारली. वीस वर्षे शहरवासीयांना नाकीनऊ आणले. टप्प्याटप्याने सगळी पाईपलाईनच बदलली. थेट पाईपलाईन योजनाही त्याच मार्गावर जाते की काय, अशी शंका यावी अशी स्थिती आहे.

काम लवकरच पूर्ण

"शिंगणापूर येथील उपशा यंत्रणा बदलण्याचे काम लवकरच पूर्ण होईल. शिंगणापूर ही पर्यायी यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर काही कारणाने थेट पाईपलाईनचा पाणी पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल."

- हर्षजित घाटगे, जल अभियंता, महापालिका

Advertisement
Tags :

.