Kolhapur Haddwadh: हद्दवाढ का थांबली?, पालकमंत्र्यांना जाब विचारणार, समितीचा इशारा
जनगणना किंवा निवडणूक जाहीर झाल्यास हद्दवाढ करता येणार नाही
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीची अद्याप तारीख जाहीर झालेली नाही. मग शहराच्या हद्दवाढीची प्रक्रिया का थांबली अशी विचारणा शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडे केली. तसेच शहराच्या हद्दवाढीमध्ये कोणी आडकाठी आणत आहे का? कोणी जाणीवपूर्वक हद्दवाढीची प्रकिया थांबवत आहे का याचा जाब पालकमंत्र्यांना विचारणार असल्याचा इशारा समितीने दिला.
शहराच्या हद्दवाढीबाबत शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीने गुरुवारी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांची भेट घेऊन हद्दवाढीच्या प्रक्रीयेबाबत चर्चा केली व निवेदन दिले. समितीचे अॅङ बाबा इंदूलकर म्हणाले, रजिस्ट्रर जनरल अॅण्ड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया यांनी देशातील जिल्हा, पालिका, पंचायतीच्या हद्दीत वाढ अथवा बदल करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिली आहे.
यानंतर 1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2027 पर्यंत हद्दीमध्ये बदल करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश राज्यांना दिले आहेत. तसेच जनगणनेची प्रक्रीया एप्रिल 2026 ते मार्च 2027 या काळात राबविण्यात येणार आहे. जनगणना किंवा निवडणूक जाहीर झाल्यास हद्दवाढ करता येणार नाही आहे. अद्याप कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.
त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत हद्दवाढ करणे अपेक्षित आहे. पण प्रशासकीय पातळीवर हद्दवाढीची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. निवडणुकीच्या कामामुळे प्रक्रिया थांबविल्याचे सांगितले जात आहे. तसे असेल तर निवडणुकीची तारीख अधिकृत जाहीर झाल्याचे कागदोपत्री दाखविण्याची मागणी अॅङ इंदूलकर यांनी केली.
यावर मनपा प्रशासनाने नगरविकास विभागाच्या आदेशानुसार कोल्हापूर महापालिकेकडून महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. त्यावर हरकती घेण्याचे काम सुरु आहे. निवडणुकीची अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. सध्या सुरु असलेले काम नगर विकास विभागाच्या आदेशानुसार सुरु असल्याचे लेखी पत्राद्वारे कळविले.
त्यानुसार निवडणुकीची अद्याप अधिकृत तारीख जाहीर झाले नसल्याने हद्दवाढीची प्रक्रिया का थांबली याचा जाब पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना विचार असल्याचे समितीने सांगितले. यावेळी समितीचे दिलीप देसाई, बाबा पार्टे, संदीप देसाई, अमित अतिग्रे, अॅङ सतिश नलवडे, रघुनाथ कांबळे, सतीश कांबळे, किशोर घाटगे, राजू जाधव, अनिल घाटगे, अशोक भंडारे आदी उपस्थित होते.