For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Thet Pipeline : एकदाच ठरवा, योजनांचे पाणी वापरासांठी की अभ्यंग स्नानासाठी

03:51 PM Apr 22, 2025 IST | Snehal Patil
kolhapur thet pipeline   एकदाच ठरवा  योजनांचे पाणी वापरासांठी की अभ्यंग स्नानासाठी
Advertisement

थेट पाईपलाईनचे पाणी नेत्यांनी म्हटल्याप्रमाणे फक्त अभ्यंग स्नानासाठीच होते की काय ?

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूरच्या थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्याबाबत नेत्यांनी ‘पाण्याने नक्की अभ्यंग स्नान हं..’ असे आश्वस्त केले होते. आता पालकमंत्री आबिटकर यांनी राई प्रकल्पातील पाण्यासाठी अभ्यंग स्नानाचा मुहुर्त काढला आहे.. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी काळम्मावाडी थेट पाईपलाईनला विलंब होऊ लागल्यावर यंदाच्या दिवाळीत थेट पाईपलाईनच्या पाण्याने नक्की अभ्यंगस्नान हं...! असे शहरवासियांना बरेच वर्ष आश्वस्त केले होते. एका दिवाळीला खरंच पाणी आले. आता थेट पाईपलाईन दर पंधरा दिवसातून बंद पडते, त्यामुळे खरंच योजना मुबलक आणि स्वच्छ पाण्यासाठी नाही तर अभ्यंगस्नानासाठीच होती का? असा समज शहरवासियांचा झाला आहे.

आता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राई (ता. राधानगरी) येथील शेतकरी मेळाव्यात धामणी प्रकल्पातून यंदाच्या दिवाळीतील अभ्यंगस्नानाचा मुहूर्त काढला आहे. थेट पाईपलाईन 24 वर्षापासून कासवछाप बनलेला राई प्रकल्पही पूर्ततेनंतर दमानं पाणी देणारा ठरू नये. शहरवासियांना मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठ्याची हमी देणारी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना कासवछाप ठरली. योजना पूर्ततेचं आश्वासन देताना योजनेचे जनक, आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी वेळोवेळी येत्या दिवाळीत शहरवासियांचं अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याचे करू, असे आश्वासन दिले होते. दोन-चार दिवाळीत पाणी न आल्याने थेट पाईपलाईन आणि अभ्यंग स्नान हा विषय चेष्ठेचा ठरला होता.

Advertisement

थेट पाईपलाईनचे पाणी येण्यास विलंब होऊ लागल्याने काही आजी-माजी नगरसेवकांनी महापालिकेच्या दारात दिवाळीदिवशी अभ्यंग स्नान करुन उपरोधात्मक आंदोलनही केले होते. शेवटी एका दिवाळीपूर्वी थेट पाईपलाईनमधून एकदाचे पाणी आले. आता शहरवासियांचा मुबलक आणि शुद्ध पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, ही मात्र एक भाबडी आशाच राहिली. दर पंधरा दिवसांतून किंवा महिन्यातून थेट पाईपलाईन दुरूस्तीच्या कारणास्तव बंद असते. थेट पाईपलाईन झाली म्हणून शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी उपसा यंत्रणेकडे दुर्लक्ष झाले. पूर्वीच ही यंत्रणाही मोडकळीस आली. त्यामुळे थेट पाईपलाईनचे पाणी नेत्यांनी म्हटल्याप्रमाणे फक्त अभ्यंग स्नानासाठीच होते की काय, असा प्रश्न शहवासियांत आहे.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यातील गेल्या 24 वर्षापासून रखडलेल्या राई येथील धामणी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले आहे, ते पूर्ण होईलही. मात्र यावेळी आताच्या पालकमंत्र्यांनीही पूर्वीच्या मंत्र्याप्रमाणेच दिवाळी अभ्यंगस्नान योजनेच्या पाण्यातूनच, असे आश्वासन रविवारी (20 एप्रिल) झालेल्या शेतकरी मेळाव्यात दिले. दिवाळी आणि अभ्यंग स्नान हा जुना मुहूर्त नव्या पालकमंत्र्यांनी काढल्याने थेट पाईपलाईनची आठवण शहरवासियांना झाली. मुळात या योजना मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी आहेत. तत्कालीन गरज म्हणून त्या-त्यावेळी या योजनांची घोषणा झाली. मात्र, अपुरा निधी, राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे या योजना कासवछाप ठरल्या.

त्या सुरू झाल्यानंतरही या योजनांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ठरल्या. राधानगरी तालुक्यातील राई येथील योजनाही आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. मात्र थेट पाईपलाईनचा अनुभव पाठीशी घेऊन धामणी प्रकल्पाची ही योजना पूर्ण झाल्यानंतरही तितक्याच क्षमतेनं ती सुरू राहील. गळती किंवा दुरुस्तीचं ग्रहण या योजनेला लागणार नाही, याचीही खबरदारी आता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. माफक अपेक्षा!राधानगरी तालुक्यातील राई येथील धामणी मध्यम प्रकल्पाला 2016 मध्ये राज्य सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता देत, 782.37 कोटींचा निधी मंजूर केला. आता योजनेच्या कामाने गती घेतली आहे.

शहरवासियांचे तीन दशकाचे स्वप्न असणारी 485 कोटींची थेट पाईपलाईन योजनेच्या कामाचा शुभारंभ 24 ऑगस्ट 2014 ला झाला. परंतु योजना पुर्ण होऊन 10 नोव्हेंबर 2023 रोजी पाणी आले. अजूनही योजनेत त्रुटी असून चालू-बंद स्थितीत असते. दोन्ही योजनांचा पूर्णत्वाचा मुहूर्त आणि ब्रीद वाक्य ‘यंदाच्या दिवाळीला योजनेतून अभ्यगंस्नान’ हेच आहे. रखडलेली योजना, कासवछाप गती हे साम्य असले तरी पूर्णत्वानंतरचे बंद पडण्याचे रडगाणं यातही नको, इतकीच कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.