ग्रामसेवकांच्या मालमत्तेची चौकशी करा ! कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नागरिकांची कामे विनाकारण प्रलंबित ठेवून त्रास देत आहेत. तक्रार केलीच तर कामामध्ये अडचणी निर्माण करुन खोडा घातला जातो. यामुळे सामान्य नागरिक ग्रामसेवकांच्या विरोधात तक्रार करण्याचे टाळतात. अशा ग्रामसेवकांना निलंबित करण्याबरोबर त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.यांना निवेदन दिले.
कृती समितीचे अशोक पोवार म्हणाले, गावांतील लोकांची कामे ग्रामपंचायतीकडून होतात.पण कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवकांकडून सामान्य नागरिकांची विनासायास होताना दिसत नाहीत. नागरिकांची कामे प्रलंबित ठेवून त्यांना वेठीस धरले जात आहे. यासाठी पोवार यांनी उचगाव येथील ग्रामपंचायतीचे उदाहरण दिले. मौजे उचगाव येथील ग्रामसेवक दत्तात्रय धनगर हे सहकार न्यायालयाच्या आदेशानुसार एका सहकारी संस्थेचा हुकुमनामा नोंद करत नाहीत. ऑगस्ट 2023 पासून ते नोंद करण्यास टाळाटाळ करत आहेत. याबाबत जानेवारी 2020 मध्ये करवीर गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनीही काहीच कारवाई केली नाही. यामुळे दप्तर दिरंगाईचे उल्लंघन झाले आहे.
हातकणंगले तालुक्यातील मौर्जे हेर्ले या गावात माळभाग बिरोबा मंदिर शेजारी एका व्यक्तीने सरकारी रस्त्यावर अतिक्रमण करुन घर बांधले आहे. याबाबत तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये अशा प्राकारे गैरप्रकार सुरु असून संबंधित ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांचे निलंबन करुन त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी केली.यावेळी कार्तिकेयन यांनी चौकशी करुन नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, कृती समितीचे रमेश मोरे,शामराव जोशी, राजाभाऊ मालेकर, प्रकाश आमते, राजवर्धन यादव,प्रशांत चौगुले,शिवाजी पाटील, बाबा वाघापूरकर, दिलीप कांबळे, निलेश देसाई ,कॉम्रेड राजेश्वर शामराव साठे , फिरोज शेख, सदानंद सुर्वे,अजित चौगुले, विनोद डुणुंग, विलास मुळे, सदानंद सुर्वे,संजय पवार उपस्थित होते.