शाब्बास, मानलं! कोल्हापुरातील बहिरेश्वरात साकारतेय लोक सहभागातून वनराई
ग्रामस्थांकडू वनविभागाकडून मिळतील त्या रोपांची लागण केली जाते
कोल्हापूर : शासनाचा उपक्रम म्हणून गावोगावी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण केले जाते. वनविभागाकडून मिळतील त्या रोपांची लागण केली जाते. उन्हाळयात रोपांना पाणी देण्याचे योग्य नियोजन नसल्याने बऱ्याचदा ही रोपे वाळून जातात. वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपण करताना भविष्यात झाडांचा फायद्या- तोट्याचा विचार केला जात नाही. पण बहिरेश्वर ग्रामपंचायतीने झाडांपासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचे गणित मांडत वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन याचे योग्य नियोजन केले आहे.
बहिरेश्वर येथे सुमारे चारशे एकर डोंगर भाग आहे. या सर्व डोंगरावर गिरीपुष्प नावाची झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. या झाडांपासून ग्रामपंचायतील फारसे आर्थिक उत्पन्न मिळत नाही. या ठिकाणी डोंगर उतारावर असणारी ही गिरीपुष्प वनस्पती काढून जेसीबीच्या साह्याने खड्डे खणले जात आहेत. याच खड्ड्यांमध्ये आंबा, सुपारी, वड, पिंपळ, कडुलिंब, सोनचाफा यासारखी सुमारे चारशे प्रकारच्या रोपांची लागण केली आहे. या रोपांच्या संवर्धनासाठी योग्य नियोजन केले आहे. उपलब्ध संपूर्ण गायरान क्षेत्रामध्ये हा उपक्रम राबविण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे.
सर्व काम लोक सहभागातून
वृक्षारोपणाचा हा उपकम पूर्णपणे लोकसहभागातून सुरू आहे. वृक्षारोपणासाठी जागा तयार करणे, झाडांसाठी खड्डे काढणे, रोपांची खरेदी, रोपांना पाणी देणे ही सर्व कामे लोकसहभागातून सुरु आहेत. ग्रामपंचायतीचा आर्थिक सहभाग नाही फक्त कर्मचाऱ्यांचे श्रमदान वापरले जाते.
गाव वेशीवर फुलझाडे
गावाकडे प्रवेश करणाऱ्या म्हारूळ, कोगे धरण व कसबा बीडकडून गावात प्रवेश करणाऱ्या तीनही रस्त्यांच्या दुतर्फा फुलांच्या झाडांची लागवड केली आहे. या झाडांना उन्हाळ्याच्या दिवसात टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. एक प्रकारे गावात प्रवेश करणारया लोकांचे या माध्यमातून स्वागत व्हावे हा या पाठीमागचा हेतू आहे.
ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे साधन
इतर झाडे लावल्यास काही वर्षानंतर नियमानुसार वृक्षतोड केल्यानंतरच ग्रामपंचायतीला आर्थिक लाभ मिळतो. वृक्षतोडीमुळे पर्यावरण असंतुलित होण्यास मदत होते. वृक्षतोड केल्यानंतर परत नवीन झाडे मोठी होईपर्यंत डोंगर भाग भकास दिसतो. फळझाडे फुलझाडे व औषधी वनस्पतींची झाडे लावल्याने भविष्यात झाडांची तोड न करता या झाडांच्यापासून ग्रामपंचायतीला फळापासून व औषधी वनस्पतींच्यापासून उत्पन्न मिळू शकेल.
पर्यावरणाचे योग्य संवर्धन
लवकर वाढणारी परदेशी झाडे केल्याने फक्त सावली मिळू शकते. शिवाय या झाडांची पान गळती मोठ्या प्रमाणात असते. यामुळे जमीन पूर्णपणे पालापाचोळ्याने झाकली जाते. या झाडांच्यापासून आर्थिक उत्पन्न फारसे मिळत नाही. पण देशी वृक्षांची लागवड केल्याने त्यापासून मिळणारी सावली, त्यापासून मिळणारा ऑक्सिजन व त्या झाडांच्या वर वास्तव्यास राहणारे पक्षांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर पर्यावरणाचे संवर्धन होण्यास चांगली मदत होईल.
वृक्षप्रेमींना आवाहन
वन विभागाकडून मिळणाऱ्या झाडांच्या किमती खूप कमी असतात. पण फळझाडे फुलझाडे व औषधी वनस्पतींच्या रोपांची किंमत अधिक असते. यामुळे या चारशे एकर जागेत वृक्षारोपण करावयाचे झाल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक भांडवलाची गरज आहे. पर्यावरण प्रेमी व वृक्ष संवर्धन सेवाभावी संस्थांनी झाडांची रोपे देऊन सहकार्य केल्यास उपक्रम अधिक प्रभावीपणे अंमलात येऊ शकतो.
जमिनीप्रमाणे नियोजन
डोंगराच्या उतारावरच्या जमिनीत माती व मऊ मुरमाचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी फळ झाडांची व औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. डोंगराच्या माथ्यावरती खडकाळ भाग असल्याने त्या ठिकाणी मातीचे प्रमाण कमी आहे. अशा ठिकाणी बांबूची लागवड करण्याचा मानस ग्रामपंचायतीचा आहे. हे संपूर्ण काम लोकवर्गणीतून सुरू आहे. ग्रामपंचायत फक्त कर्मचारी वर्ग श्रमदान करतो
वेगळी दिशा देणारा उपक्रम
पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर सर्वत्र वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले जातात. पण पुढे त्याचे संवर्धन होईलच असे नाही. रोपांना पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात वाळून जातात. पण बहिरेश्वर ग्रामपंचायतीने वीस हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा हौद बांधला आहे.
यामध्ये सौर उर्जेवर चालणाऱ्या विद्युत पंपाच्या साह्याने पाणी टाकले जाते. या टाकीतील पाणी ठिबक पद्धतीने झाडांना दिले जाते. वृक्षारोपण करतानाच उन्हाळ्याच्या दिवसात रोपांना पाणी देण्याचे योग्य नियोजन केले आहे. भविष्यात ही ठिबक योजना सुद्धा सोलरवर कार्यान्वित करण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे. यामुळे पारंपरिक ऊर्जा स्त्राsताचा वापर केल्याने लाईट बिलाची बचत होते.
पर्यटन स्थळाच्या दृष्टीने प्रयत्न
बहिरेश्वर येथे प्राचीन श्रीकृष्ण तलाव आहे.या तलावाच्या सुशोभिकरणासाठी निधी मंजूर झाला असून त्याचे काम सुरू आहे. तसेच गाव वेशीवर गावाचे जागृत म्हसोबा देवस्थान आहे. येथे संपूर्ण जिल्हा व जिल्हा बाहेरील भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात. म्हसोबा देवालय व श्रीकृष्ण तलाव डोंगर पायथ्यालाच असल्याने या ठिकाणी येणारे भाविक या वनराईमध्ये पर्यटनासाठी यावेत या दृष्टीने नियोजन केले आहे.
शासनाच्या सहकार्याची गरज
या जमिनीत गिरीपुष्प नावाच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही झाडे काढून वृक्षारोपण करण्यासाठी शासन स्तरावरून परवानग्या मिळण्यात अडथळे निर्माण होतात. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहाणी करून आशा चंगल्या उपकमांना सहकार्य करण्याची गरज आहे.
स्वतंत्र निधी मिळावा
"ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने लोक वर्गणीतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. झाडे लावण्यासाठी जागा तयार करणे त्याचबरोबर खड्डे खणणे आणि महागड्या किमतीची रोपांची लागवड करणे हे काम लोकवर्गणीतून कुवतीप्रमाणे सुरू आहे. शासनाने यामध्ये मदतीचा हात दिल्यास किंवा इतर सेवाभावी संस्थांनी रोपे देऊन सहकार्य केल्यास हा उपक्रम अधिक वेगाने सुरू राहून लवकरात लवकर पूर्णत्वास येईल."
- वंदना दिंडे, लोकनियुक्त सरपंच