कोहली भारतात दाखल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
22 मार्चपासून आयपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत असून भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहली या स्पर्धेसाठी आरसीबी संघातच्या सराव शिबिरासाठी मायदेशात दाखल झाला आहे.
रविवारी येथे विराट कोहलीचे आगमन झाले. अलीकडेच विराटच्या पत्नीने अकाय नावाच्या मुलाला जन्म दिला. विराटचे हे दुसरे अपत्य आहे. विराटची पत्नी अनुष्का हिची प्रसुती ब्रिटनमध्ये झाली होती. त्यामुळे तिच्या समवेत राहण्यासाठी विराट भारत-इंग्लंड दरम्यानच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. आयपीएल स्पर्धेत आरसीबीचा विराट कोहली हा भरवशाचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. आरसीबीच्या सराव शिबिरात विराट लवकरच दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. आरसीबी संघाने आतापर्यंत एकदाही आयपीएल क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही. गेल्या वर्षीच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीने 639 धावा जमविल्या होत्या.