कोगनोळी सीमा तपासणी नाका होणार बंद
कोल्हापूर :
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आणि वस्तू व सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या निर्णयामुळे कोल्हापूर आणि कर्नाटकच्या सीमेवरील कोगनोळी सीमा तपासणी नाका बंद होणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीची कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनला प्रतीक्षा आहे.
सन 1966 मध्ये स्थापन झालेल्या या सीमा चौक्यांचा उद्देश वाहनांची हालचाल नियंत्रित करणे, परिवहन नियमांचे पालन सुनिश्चित करणे आणि रस्ते कर वसूल करणे असा होता. कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या सीमेवर कोगनोळी येथे परिवहनचा सीमा तपासणी नाका होता. यानंतर काही वर्षापूर्वी हा नाका खासगी ठेकेदाराला देण्यात आला. दरम्यान, मध्यप्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व सीमा तपासणी नाके बंद करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटरर्स असोसिएशनने केली होती. या मागणीसाठी असोसिएशनने आंदोलन केले आहे. तसेच लढा दिला आहे. पण अद्याप तरी हा नाका बंद झालेला नाही. या नाक्यावरुन रोज सुमारे पंधरा लाख रुपयांचा महसूल मिळतो.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी 15 एप्रिलपासून महाराष्ट्रातील बीओटी तत्वासह सर्व आरटीओ सीमा तपासणी नाके बंद करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात सीमा तपासणी नाका बंद झाला नाही. यानंतर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी डिजिटल अंमलबजावणीच्या उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे प्रत्यक्ष चौकशीसाठी स्थापन केलेल्या या सीमा चौकींची आवश्यकता आता उरलेली नाही. त्यामुळे हे नाके लवकरच बंद होतील, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयाचे कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनने स्वागत केले आहे.
- सीमा तपासणी नाक्यांची गरज राहिली नाही.
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि वस्तू व सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सर्व वाहनांची माहिती ऑनलाईन मिळते. यामुळे कर चुकवण्याचा प्रकार होणार नाही. सीमा तपासणी नाक्यांची गरज उरली नाही. हे नाके बंद होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनने लढा दिला आहे. नाके बंद होण्याकडे असोसिएशनचे लक्ष आहे.
- सुभाष जाधव अध्यक्ष, जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशन