Satara News | डोंगर फोडला, रस्ता काढला, पण 'त्या' ३०० मीटरचं गुपित काय? मंत्र्यांच्या आदेशानंतरही कोळेकरवाडी अंधारात!
कोळेकरवाडीत ३०० मीटर रस्ता रखडला;
चाफळ : संपूर्ण डोंगर फोडूनकोळेकरवाडीसाठी मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून रस्त्याचे मोठे काम मार्गी लागले खरे, मात्र सुरुवातीचा अवघ्या ३०० मीटरचा रस्ता अद्यापही प्रलंबित असल्याने ग्रामस्थांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. विशेष म्हणजे, मंत्री देसाई यांनी 'जनता दरबारात' हा प्रश्न स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोडवावा, असे निर्देश देऊनही अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे 'आम्ही अजून किती दिवस ऊन-पावसात श्रमदान करायचे?' असा आर्त
सवाल कोळेकरवाडीतील महिला व बुद्धांनी उपस्थित केला आहे.
सध्या कोळेकरवाडीत शासनाच्या 'घरकुल' योजनेचीकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मात्र गावाकडे जाणारा डोंगररस्ता सुरुवातीला केवळ ३०० मीटर असलेला हा रस्ताकच्चा आणि मातीचा असल्याने पावसाळ्यात किंवा एखादे वाहन गेल्यावर तिथे प्रचंड खट्टे पडत आहेत. परिणामी पिण्याच्या पाण्याचा टैंकर कोळेकरवाडीला नेणे कठीण झाले आहे. येथे घरकुलासाठी लागणारे बांधकाम साहित्य पोहोचवताना मोठी कसरत करावी लागत आहे. गाड्या सहज वर जात नसल्याने ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी मंत्री देसाई यांची भेट घेतली असता, त्यांनी स्थानिक स्तरावर हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले होते. मात्र अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे मंत्री देसाईनी रखडलेला ३०० मीटरचा रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधितांना तातडीने सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.