Satara News | सुजाण नेतृत्वाला समाजशास्त्राची जाण आवश्यक - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
कराडमधील अधिवेशनात माजी मुख्यमंत्रींचा संदेश
कराड - सुजाण नेतृत्वाला समाजशास्त्राची जाण व भान असणे आवश्यक असते. त्यासाठी विद्यापीठे केवळ पदवीदानाची केंद्रे न राहता ज्ञाननिर्मितीची सक्रिय केंद्रे बनली पाहिजेत, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद व कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संशोधनाच्या नव्या वाटा खुल्या व्हाव्यात माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, संशोधनाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इतिहास संशोधन अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने शासनाने स्वतंत्र संशोधन निधी निर्माण करणे आवश्यक आहेच, पण उद्योजकांनीही संशोधकांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. मराठा इतिहास व्यापक समाजासमोर प्रभावीपणे मांडायचा असेल, तर मोडी कागदपत्रांचा शास्त्रशुद्ध अभ्यास अपरिहार्य आहे.
२८ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील होते. कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये अधिवेशन झाले. समाजात परिवर्तन घडविण्यासाठी समाजशास्त्राचे अध्ययन आणि इतिहासाचे सकारात्मक संशोधन या दोन बाबींच्या महत्त्वाची जाणीव असणारे नेतृत्व विकसित होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. टी. एस. पाटील म्हणाले, इतिहासकार विज्ञाननिष्ठ असला पाहिजे. इतिहासलेखनात वस्तुनिष्ठता, चिकित्सक दृष्टी आणि निभर्भीडपणाही आवश्यक असून इतिहास लेखन हे भावनांपेक्षा पुराव्यांवर आधारित असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. अभयकुमार पाटील यांनी आभार मानले. यावेळी शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. अवनीश पाटील, डॉ. चंद्रकांत खिलारे, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीडाळ, अॅड. रविंद्र पवार, डॉ. संदीप महाजन, डॉ. सुनील जाधव, डॉ. सुरेखा पाटील, डॉ. अजित पवार आदी उपस्थित होते.