गुंजीतील विहिरीच्या वाटेवर गुडघाभर पाणी
मोर्चाची कुणकुण लागतातच घाई गडबडीत केला रस्ता
वार्ताहर /गुंजी
येथील जीवनदायीनी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या वाटेवर गुडघाभर पाणी तुंबत असल्याने पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या महिलांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक वेळा सांगून देखील पंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. येत्या चार-पाच दिवसात या समस्येचे निराकरण झाले नाही तर पंचायत व कंत्राटदाराच्या कॅम्पवर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही दिला होता. याची कुणकुण कंत्राटदाराला लागताच सदर कंत्राटदाराने गुऊवारी घाईगडबडीत पाईप घालून माती टाकून रस्ता केला आहे. मात्र यावर खडी आणि मुरूम घालून रस्ता चिखलमुक्त करण्याची गरज महिला व नागरिकांतून व्यक्त होत आहे.
या एकमेव विहिरीचे पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. त्याचबरोबर याच वाटेवरून भालका, शिंपेवाडी, करंजाळ, भटवाडा गावचे नागरिक, शेतकरी ये-जा करतात. मात्र गतवर्षीपासून या विहिरीच्या वाटेवरून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने वाटेवर माती टाकून भराव टाकला आहे. त्यामुळे उर्वरित वाटेवर पाणी तुंबत असल्याने पाणी आणणे व ये-जा करणे कठीण बनले आहे. सध्या या भागामध्ये जोरदार पाऊस सुरू असून,या वाटेवरून सतत पाणी वाहत असल्याने विहिरीचे पाणी आणणे धोकादायक बनले आहे. वास्तविक सदर समस्या दोन-तीन महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामसभेमध्ये महिलांनी मांडून वाटेची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. त्यावेळी रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप याची योग्य पूर्तता झाली नसल्याने नागरिक आणि महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. येथील युवा कार्यकर्ते पंकज कुट्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी पंचायत अध्यक्ष व पीडीओंना या वाटेची प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. मात्र त्याकडे पाठ फिरविल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.