For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Konkan: खेडमध्ये नदीकाठची 24 गावे जोखीमग्रस्त, वैद्यकीय आरोग्य पथकांची करडी नजर

11:31 AM May 05, 2025 IST | Snehal Patil
konkan  खेडमध्ये नदीकाठची 24 गावे जोखीमग्रस्त  वैद्यकीय आरोग्य पथकांची करडी नजर
Advertisement

मुसळधार पर्जन्यवृष्टीचा सर्वाधिक फटका नदीकाठच्याच गावांना बसतो

Advertisement

रत्नागिरी (खेड) : पावसाळा काही दिवसांवरच येऊन ठेपला असून तालुका आरोग्य यंत्रणा आतापासूनच सतर्क झाली आहे. तालुक्यातील 24 गावांमध्ये आपत्ती काळात नदीकाठच्या गावात रोगराई पसरण्याचा संभाव्य धोका लक्षात घेत ही गावे जोखीमग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. यापूर्वीच्या साथग्रस्त गावांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.

उर्वरित 4 साथग्रस्त गावांमध्ये नैसर्गिक आपत्ती, साथरोग नियंत्रण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या गावांवर वैद्यकीय आरोग्य पथकांची करडी नजर ठेवण्यात येणार आहे. पथकेही 24 तास कार्यरत राहणार आहेत. मुसळधार पर्जन्यवृष्टीचा सर्वाधिक फटका नदीकाठच्याच गावांना बसत असतो. यामुळे रोगराई पसरण्याचा जास्त धोका असल्याने आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. या साथींच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरग्रस्त भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

पूरपरिस्थितीदरम्यान निर्माण होणाऱ्या समस्येचा निपटारा करण्यासाठी आरोग्य विभागाने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाची निर्मिती केली आहे. तालुक्याच्या मुख्य ठिकाणाहून आपत्ती परिस्थिती गावात अर्ध्या तासात मदत मिळण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाच्या पथकाला सूचना देण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीत नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यापासून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून मेडिक्लोरसारख्या पाणी शुध्द करणाऱ्या औषधांचे वाटप करण्यात येणार असून यासाठी अतिरिक्त औषधांचा साठा करण्यात आला आहे.

पावसाळ्यात करावयाच्या उपाययोजनांची प्रात्यक्षिकेही करण्यात येत असून आरोग्यसेविका व आरोग्यसेवक गावनिहाय भेटी देवून उद्भवणाऱ्या आजारांविषयी मार्गदर्शन करत आहेत. पूर परिस्थितीमध्ये पुराने प्रभावीत होणाऱ्या जोखिमग्रस्त नदीकाठच्या गावांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. 8 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारितील साथग्रस्त गावे, जोखीमग्रस्त, टँकरग्रस्त, दुर्गम व कठीण असे विभाग करण्यात आले आहेत.

जोखिमग्रस्त गावांवर आरोग्य विभागाचे लक्ष राहणार आहे. बोरघर, कशेडी, खवटी, सुमारगड-धनगरवाडी, चिंचघर-प्रभूवाडी, चाकाळे, भरणे, सुकिवली, उधळे बुद्रुक, कळंबणी बुद्रुक, चाटव भरणे, नांदिवली, अस्तान, सार्पिली, चोरवणे, कोतवली-टेप भोईवाडी, शेल्डी-हेदवाडी, पायरवाडी, सोनगाव-भाईवाडी, अलसुरे-मोहल्ला, आयनी-भाईवाडी, लवेल-गणवालवाडी, शिव बुद्रुक-भोईवाडी, आष्टी-मोहल्ला यांचा जोखिमग्रस्त गावामध्ये समावेश आहे.

साथग्रस्त गावांमध्ये आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतच्या किंजळे, वावे अंतर्गत मुसाड, शिव बुद्रुक अंतर्गत बोरज, तिसंगी अंतर्गत जांभुळगाव यांचा समावेश आहे. साथीचे आजार प्रामुख्याने डासांमार्फत पसरत असल्याने डास निर्मूलनासाठी विशेष उपाय आखण्यात आले आहेत. पाणी साचून डासांची पैदास होणार नाही, याकडे गांभिर्याने लक्ष दिले जाणार आहे. चिंचघर-प्रभूवाडी, चाकाळे गावांवरही बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.

आतापासूनच विशेष उपाययोजना आखण्यावर भर

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथींचा फैलाव रोखण्यासाठी आतापासूनच विशेष उपाययोजना आखण्यावर भर देण्यात आला आहे. मनुष्यबळाचा अभाव असला तरी त्या-त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत साथग्रस्त गावांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. आपत्ती काळात रुग्णांना सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सदैव तत्पर राहिल, असे खेड तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेश खरटमोल यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.