Satara News : वादळी वाऱ्याने महावितरणचे नुकसान
खंडाळा: खंडाळा शहराबरोबर पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र, या वादळाचा मोठा फटका महावितरणच्या पायाभूत सुविधांना बसला असून, यामध्ये महावितरणचे सुमारे ८ लाख रुपये नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत रात्री ११ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले. शहरासह पश्चिम भागाला वादळी वाऱ्याचा फटका बसला. अनेक ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर कोसळल्या. तर वादळाच्या तीव्रतेमुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले.
वीज वाहिन्या तुटल्यामुळे दहा ते पंधरा गावात सुमारे सहा तास वीजपुरवठा खंडित झाला होता. खंडाळ्याचे महावितरणचे अभियंता फुलचंद फड आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने तात्काळ नुकसानग्रस्त ठिकाणी भेट देवून पाहणी केली.
त्यानंतर अंधाराचे साम्राज्य असतानाही कर्मचायांनी जीवाची पर्वा न करता दुरुस्तीचे काम हाती घेतले. वाकलेले खांब सरळ करणे आणि तुटलेल्या तारा जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
महावितरणचे कर्मचारी आणि ठेकेदार यांचे कामगार यांनी अखेर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. ऐन संकटाच्या वेळी महावितरणने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांबद्दल खंडाळावासीयांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.