खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने आज मोर्चा
प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मंगळवार दि. 18 रोजी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मराठी शिक्षकांच्या भरतीत स्थान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येणार आहे. यासाठी खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक आणि समिती कार्यकर्त्यांनी सकाळी 11.30 वाजता बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
कर्नाटक शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आगामी शिक्षक भरतीत मराठी माध्यमाच्या शाळांसाठी जागा न ठेवता, मराठी भाषिक शिक्षकांना आणि शाळांना जाणीवपूर्वक डावलण्याचे धक्कादायक धोरण अवलंबिले आहे. हा आपल्या मातृभाषेवर आणि भावी पिढीच्या शिक्षणावर थेट परिणाम होणार असल्याने मराठी भाषेचे अस्तित्व संपविण्याचा कर्नाटक सरकारचा डाव असल्याने या अन्यायाविरुद्ध प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आणि मराठी माध्यमाच्या जागा त्वरित मंजूर कराव्यात या मागणीसाठी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयावर मंगळवार दि. 18 रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना मराठी शिक्षक भरतीसंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील मराठी भाषिक तसेच समिती कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, सचिव आबासाहेब दळवी यांनी केले आहे.