काटामारी, रिकव्हरी चोरी ही शेतकऱ्यांसमोरची मोठी समस्या : माजी खासदार राजू शेट्टी
सरवडेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा
सरवडे : गेल्या काही वर्षात काटामारी, रिकव्हरी चोरी आणि उपपदार्थातील लुबाडणूक ही शेतकऱ्यासाठी मोठी समस्या बनली आहे. 'एफआरपी' दरात गेल्या पाच वर्षात ६५० रुपयांची वाढ झाली असली तरी ऊस दर मात्र ३,००० ते ३,२०० रुपयांबर स्थिर आहे. खते, बियाणे, मजुरी, किटकनाशके यांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली असून उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. या अन्यायाविरुद्ध आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी संघटित व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
येथील हनुमान मंदिर परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २४ व्या ऊस परिषदेच्या शेतकरी निमंत्रण मेळाव्यात ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, संघटना ही केवळ संघटना नाही, तर ती शेतकऱ्याच्या स्वाभिमानाची चळवळ आहे. शिरोळ येथील पहिल्या आंदोलनातून पेटलेली ठिणगी आज अख्ख्या महाराष्ट्रात धगधगत आहे. दोन दशके पूर्ण करून संघटना शेतकऱ्यांच्या न्यायासाठी अजूनही रात्रंदिवस लढत आहे.
जिल्हाध्यक्ष अजित पोवार म्हणाले, बिद्री साखर कारखान्याने को-जनरेशन प्रकल्पाच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना २०० ते ३०० रुपये जादा भाव देण्याचे दिलेले बचन पाळले नाही. उलट २८ कोटींच्या को-जनरेशन प्रकल्पाचा हिशोब नफा-तोटा खात्यात दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
डॉ. बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील जैनापूरकर, आनंदा पाटील, पांडुरंग जरग, विठ्ठल पाटील, कामगार नेते शामराव मोरे, संतोष बुटाले, विजय पाटील यांची भाषणे झाली. मेळाव्यास संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.