कसबा बावडा समस्यांच्या गर्तेत
कसबा बावडा / सचिन बरगे :
पिण्याच्या पाण्याची गैरसोय, रस्त्यांची दयनीय अवस्था, वाहतूक कोंडी, तुंबलेल्या गटारी, फुटपाथवरील कचऱ्याचे ढीग आणि त्यावर अवलंबून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट अशा अनेक समस्यांमुळे कसबा बावडा परिसर सध्या विविध समस्यांच्या गर्दीत अडकला आहे. कसबा बावडा-लाईन बाजार परिसर हा महापालिकेच्या आराखड्यानुसार एक ते सहा प्रभागांमध्ये समाविष्ट आहे. कोरोना आणि इतर कारणास्तव लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुका अनेक वर्षे प्रलंबित आहेत. महापालिका सभागृहाची मुदत संपल्यामुळे महापालिकेवर सध्या प्रशासक राज आहे.
स्थानिक नगरसेवक नसल्यामुळे भागातील समस्या सोडवण्यासाठी नागरिकांना थेट प्रशासनाशी संपर्क करावा लागत आहे. त्यामुळे सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी अवस्था पाहायला मिळते. माजी नगरसेवक जरी असले तरी काही प्रभागात त्यांना नागरिकांचे कोणतेही सोयरसुतक नसल्याने प्रभागातील समस्या सांगायच्या कोणाला, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पावसाळ्याच्या तोंडावरच ड्रेनेज पाईपलाईनसाठी रस्त्यांची खुदाई केली आहे. शुगर मिल कॉर्नर ते राजाराम कारखाना या रस्त्याची तर चाळण झाली आहे. तसेच परिसरात मुख्य रस्त्यासह आंबेडकर नगर, शुगर मिल कॉर्नर, उलपे मळा परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे. गटारी वेळेवर साफ न केल्याने उलपे मळा परिसरात सांडपाणी थेट रस्त्यावर येताना पाहायला मिळते. त्यामुळे या भागात सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने रोगराई निर्माण झाली आहे.
- टाक्या आहेत पण त्यात पाणीच नाही!
गल्ल्यांची रचना असलेल्या कसबा बावड्यात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी अमृत योजनेंतर्गत दहा लाख लीटर क्षमता असलेल्या दोन टाक्या बांधल्या आहेत. पण महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे या टाक्यांमध्ये गेली अनेक वर्षे पाणीच सोडलेले नाही. परिणामी बावड्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे.
- भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट
कसबा बावडा परिसरात सध्या भटक्या कुत्र्यांनी थैमान घातले आहे. मॉर्निंग वॉकला येणारे नागरिक आणि वाहनांवर झुंडीने हल्ला करणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. नागरी समस्यांबरोबर आता भटक्या कुत्र्यांची समस्या उद्भवली आहे. विद्यार्थी, दोन चाकी वाहनधारक, पादचारी तसेच मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे ही सर्वस्वी जबाबदारी महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाची असते. महापालिका प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
- कर्मचाऱ्यांअभावी परिसरात अस्वच्छता
प्रभाग क्रमांक एकमध्ये महापालिकेच्या स्वच्छता विभागात कर्मचारी कमी असल्यामुळे शुगर मिल, उलपे मळा परिसरातील रस्ते व गटारींची वेळेवर स्वच्छता होत नाही. येथील खाजगी व सहकारी कारखान्याचे सांडपाणी याच गटारीतून सोडले जाते. या परिसरात महापालिकेचा एकच कर्मचारी असून येथील रस्ते व गटारीची स्वच्छता होत नाही. परिणामी तुंबलेल्या गटारीतील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येऊन घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
- अविनाश उलपे, नागरिक
- कोंडाळे नसल्याने कचरा रस्त्यावर
येथील आंबेडकर नगरमधील लोकवस्तीच्या मानाने महापालिकेची स्वच्छता यंत्रणा कमी पडताना दिसत आहे. येथील काही भागात कचरा कोंडाळे नसल्यामुळे रस्त्याच्या कडेलाच कचरा पडलेला असतो. या कचऱ्याचा उठाव वेळेवर होत नाही. अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- तानाजी शिंगे, नागरिक