ZP Election 2025: BJP चा 'तो' निर्णय विरोधकांसाठी ठरणार आव्हान?, नेत्यांकडून सोयीनुसार आघाडी
येथे महाविकास विरुद्ध महायुती अशी लढत होण्याची शक्यता कमी कारण...
कसबा तारळे : कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघ हा कौलव पंचायत समिती आणि कसबा तारळे पंचायत समिती मतदारसंघापासून मिळून बनला आहे. याठिकाणी भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील (कौलवकर) आणि राधानगरीचे माजी सभापती संजयसिंह कलिकते यांच्या हक्काची मतदारसंख्या आणि गट अजूनही अस्तित्वात आहे.
त्यामुळे येथे महाविकास विरुद्ध महायुती अशी लढत होण्याची शक्यता कमी आहे. स्थानिक नेते सोयीनुसार आघाडी करून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यातही या मतदारसंघात भाजप कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण भाजपचा निर्णय विरोधकांसाठी कडवे आव्हान ठरु शकतो.
कसबा तारळे मतदारसंघाची मतदारसंख्या 32 हजारावर असून 26 गावांचा समावेश आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, भारतीय जनता पार्टी शेतकरी संघटना, शिवसेना दोन्हीही गट, आरपीआयसह व्यक्तिनिष्ठ गटाला मानणाऱ्या मतदारांची संख्या संमिश्र असल्याने पक्षश्रेष्ठीलाही उमेदवारी निवडीबाबत डोकेदुखी ठरणार आहे.
महाविकास-महायुतीमध्ये कोणते गट सामील होणार यावरूनच उमेदवारी निश्चित होणार. यामुळे इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. 2012च्या निवडणुकीत ‘गोकुळ’चे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या पत्नी अनिता डोंगळे यांचा राधानगरीचे माजी सभापती संजयसिंह कलिकते यांच्या पत्नी मंगल कलिकते यांनी पराभव केला.
कौलव पंचायत समितीमधून भोगावतीचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील यांच्या पत्नी रुपाली पाटील यांनी भोगावती शिक्षण प्रसारकचे संचालक सुभाष पाटील यांच्या पत्नी धनश्री पाटील यांचा पराभव केला. तसेच कसबा तारळे पंचायत समितीमधून जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या पत्नी वंदना पाटील या भोगावतीचे संचालक रवींद्र पाटील यांच्या पत्नी विमल पाटील यांना केवळ एकमताने पराभूत करुन निवडून आल्या होत्या.
2017 च्या निवडणुकीत कौलव जिल्हा परिषद मतदारसंघ कसबा तारळे मतदारसंघ म्हणून घोषित झाला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून संजयसिंह कलिकते, राष्ट्रीय काँग्रेसकडून पांडुरंग भांदिगरे, भाजपकडून संदीप पवार, शेतकरी संघटनेकडून दीपक पाटील, अपक्ष म्हणून अरुण पाटील यांनी नशीब आजमावले होते.
यापैकी पांडुरंग भांदिगरे यांनी विजयी सलामी दिली. कौलव पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादीचे युवराज पाटील यांचा पराभव करून रविश पाटील विक्रमी मतांनी विजयी झाले होते. तसेच कसबा तारळे पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या दीपाली पाटील यांनी बाजी मारली होती.
माजी आमदार पी. एन. पाटील, कृष्णराव किरुळकर यांच्या निधनानंतर संघटित राष्ट्रीय काँग्रेस काहिशी विचलित झाली आहे. त्यामुळे महाविकासविरुद्ध महायुती अशी थेट लढत न होता स्व. आमदार पी. एन. पाटील गट, माजी आमदार के. पी. पाटील गट, नामदार प्रकाशराव आबिटकर गट, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले गट.
तसेच धैर्यशील पाटील गट, व्होट बँक म्हणून ओळखला जाणारा संजयसिंह कलिकते गट, शेकापचा एकनाथराव पाटील गट, जनता दलाचा वसंतराव पाटील गट, शिवसेना दोन्ही गट, शेतकरी संघटना आरपीआय गवई गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशा अनेक छोट्या-मोठ्या गटांची आघाडी निर्माण होणार आहे.
तसेच केंद्र आणि राज्यात सत्ताधारी असणारी भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडी किंवा स्थानिक आघाड्या पुढे तगडा उमेदवार देऊन कसे आव्हान निर्माण करते हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.