For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटक पॅटर्न : हत्तींना रोखाच - नको भिजत घोंगडे?

06:29 AM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटक पॅटर्न   हत्तींना रोखाच   नको भिजत घोंगडे
Advertisement

रक्ताचे पाणी करून उभारलेल्या शेती-बागायती हत्तींकडून उद्ध्वस्त होत असताना शेतकऱ्यांना होणाऱ्या वेदना सहनशिलतेपलीकडे गेल्या आहेत. हत्तींची शेतकऱ्यांवर हल्ले करण्याचीही मजल गेली असून एका शेतकऱ्याचा हत्तीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन हत्ती प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार, की कायमचे भिजत घोंगडे ठेवणार, हा कळीचा प्रश्न आहे. गेल्या 23 वर्षांपासून निर्माण झालेला हत्तींचा प्रश्न सोडविण्यासाठी कर्नाटक पॅटर्न वापरून हत्ती पकड मोहीम राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि शेतकऱ्यांवर सतत भीतीच्या छायेची असणारी टांगती तलवार दूर करावी, अशी अपेक्षा आहे.

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरूच आहे. अन्न व पाण्याच्या शोधात आता जंगलातून थेट लोकवस्तीत हत्ती येऊ लागले आहेत. दिवसाढवळ्या रस्त्यावर फिरू लागले आहेत. गेली 23 वर्षे या रानटी हत्तींपासून शेतकरी त्रस्त असून भयभीत जीवन जगत आहेत. हत्तींचे संकट दूर करण्यात शासन व प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. या हत्ती संकटातून आमची मुक्तता कधी होणार, असा प्रश्न हताश होऊन शेतकरी करीत आहेत.

Advertisement

2002 मध्ये प्रथम सात हत्तींचा कळप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात दाखल झाला होता. त्यानंतर पुढील वर्षभर या कळपाच्या हालचाली दोडामार्ग तालुक्यापुरत्याच मर्यादित होत्या. याच दरम्यान 2004 मध्ये आठ हत्तींनी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी मध्येच दोडामार्ग तालुक्यात आलेल्या 25 हत्तींपैकी 16 हत्तींना मागे पिटाळून लावण्यात वन विभागाला यश आले. मात्र, 2005 पासून रानटी हत्ती सिंधुदुर्ग निवासी झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2009 मध्ये एकूण 17 हत्ती असल्याचे सांगितले जात होते. 2009 मध्ये दुसऱ्यावेळी वन विभागाने हत्ती पकड मोहिमेची तयारी केली. आसाममधून विशेष पथक आले होते. मात्र, या मोहिमेत दोन हत्तींचा मृत्यू झाला. त्यानंतर 2015 मधील हत्ती पकड मोहिमेनंतर पकडलेल्या तीन हत्तींपैकी दोन हत्तींचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाला होता.

त्यानंतरही कर्नाटकच्या जंगलातून सिंधुदुर्गात तिलारी खोऱ्यात हत्तींचे येणे-जाणे सुरुच राहिले. या हत्तींनी शेत शिवारात येत प्रचंड प्रमाणात पीक हानी केली आहे. हत्तीच्या पायी शेतकऱ्यांना संकटाचे दिवस झेलावे लागत आहेत. हत्तीच्या हल्ल्यात जीवित हानीही झालेली आहे. भारतात सर्वाधिक हत्ती नुकसान भरपाई दिलेला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गचे नाव घेतले जाते. परंतु, हत्तींच्या भीतीपोटी शेती पीकच घेणे अनेक शेतकऱ्यांनी सोडून दिले आहे. हत्तींनी केलेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत मिळाली. हत्ती शेतीबागाच नष्ट करत असल्याने पुन्हा शेतीबागा उभ्या करण्याचे धाडस होत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकरी राजाला सुखाने शेती करून मुक्त वातावरणात जगायचे असेल, तर हत्तींचा योग्य बंदोबस्त करावाच लागेल.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड या भागासह सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे, घाटिवडे, बांबर्डे, सोनावल, पाळये, केर, मोर्ले आदी गावांमध्ये हत्तींचा उपद्रव सतत पाहायला मिळतो. या रानटी हत्तींकडून शेती-बागायती नष्ट केल्या जात असून रक्ताचे पाणी करून अतिशय मेहनतीने बागा उभ्या केल्या होत्या. केळी, माड बागायती अक्षरश: नष्ट झाल्या आहेत. त्यातच आता गवारेडे, माकडे या वन्य प्राण्यांकडूनही बागायतींचे मोठे नुकसान केले जात आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. शेती बागायतींबरोबरच वन्यप्राणी आता मानवी वस्तीकडे वळले आहेत. हत्तींसोबत या प्राण्यांचा उपद्रव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचा ठरतो आहे.

हत्तींच्या उपद्रवामुळे शेती बागायती नष्ट होत असतानाच शेतकऱ्यांच्या जीविताला धोका असल्याने हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने शेतकरी करीत आहेत. यासंदर्भात सरपंच संघटनेने आंदोलनही केले. परंतु, शासन व प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे अखेर जे घडायला नको होते, ते घडलेच. 8 एप्रिलला मोर्ले येथील लक्ष्मण यशवंत गवस या शेतकऱ्यास हत्तीने पायदळी तुडवित ठार केलं. या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त झालेल्या मोर्ले तसेच तालुक्यातील ग्रामस्थांनी वन विभागाला धारेवर धरत वनखात्यावर रोष व्यक्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने अखेर शेतकऱ्याला मृत्यूला सामोरे जावे लागले. आणखी जीवितहानी होऊ नये, यासाठी आता तरी जागे व्हा, अशी मागणी केली जात आहे.

हत्तींच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर जागे झालेल्या शासन, प्रशासनातर्फे दोडामार्गमध्ये उपद्रव माजविणाऱ्या ‘ओंकार’ नावाच्या नर हत्तीस बंदिस्त करण्यास नागपूर येथील मुख्य वन्यजीवरक्षक तथा प्रधान वनसंरक्षक यांनी मंजुरी दिली. त्यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांनी निर्देश दिले होते. त्यानंतर आता पंधरा दिवस झाले मात्र वनखात्याकडून त्याची कोणतीही कार्यवाही सुरू केली गेलेली नाही. हत्ती बंदिस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करणे, बंदिस्त करणाऱ्यांची टीम बोलविण्याबाबत काहीच हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे उपद्रवी हत्तींपासून शेतकऱ्यांचे अजून जीव घेण्याची वाट पाहात आहात का, असा आर्त सवाल  उपस्थित केला जात आहे.

हत्तींपासून सुटका होण्यासाठी कर्नाटक पॅटर्न अमलात आणावा, अशीही मागणी होत आहे. त्यासाठी सगळ्या पार्श्वभूमीवर सरपंच व ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामस्थ व काही पत्रकारांनी कर्नाटकातील हत्ती पकड मोहीम यशस्वी केलेल्या भागाचा अभ्यास दौरा केला. ही टीम कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील बिक्कोडे गावात पोहोचली. या गावात सुमारे एक-दोन नाही, तर तब्बल 80 हत्तींच्या कळपाचा वावर असल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. त्यांनी हासन जिल्ह्याचे उपवनसंरक्षक सौरभकुमार यांच्याशी चर्चा करत भौगोलिक परिस्थितीची व हत्ती पकड मोहिमेबाबत सविस्तर माहिती घेतली. दोडामार्गमध्ये जशा डोंगर-दऱ्या आहेत, तशाच कर्नाटकच्या हासन जिल्ह्यात आहेत. त्यामुळे हत्ती पकड मोहीम राबविणे शक्य आहे. जशी कर्नाटक राज्याने हत्ती पकड मोहिमेस परवानगी दिली, तशी महाराष्ट्र राज्याने परवानगी दिली पाहिजे. तरच कर्नाटक पॅटर्न सिंधुदुर्गातही राबविता येईल आणि हत्तींना रोखणे शक्य होणार आहे.

उपद्रवी हत्तींना बंदिस्त करणे किंवा हत्ती पकड मोहीम राबविणे खर्चिक असली तरी मानवी जीवापेक्षा खर्च महत्त्वाचा नाही. माणसाचा जीव अनमोल आहे. त्यामुळे हत्तींना रोखण्यासाठी उपाययोजना करायलाच हव्यात. कर्नाटकमधील बिक्कोडो गावात राबविण्यात येत असलेल्या हत्ती पकड मोहिमेसाठी वन विभागाने सात शिकाऊ हत्तींना तैनात केले आहे. ज्या भागात हत्तींचा वावर आहे, अशा ठिकाणी वन विभागाचे ‘एलिफंट टास्क फोर्स’ 24 तास तळ ठोकून राहतात. हत्ती पकड मोहिमेसाठी 20 अधिकारी, वनविभागाचे 17 इतर कर्मचारी व अन्य कंत्राटी कर्मचारी असा फौजफाटा दाखल असतो. जो हत्ती अति त्रासदायक असतो, त्याच्यावर लक्ष केंद्रीत करून त्याला पहिले पकडले जाते आणि दूरवरील नैसर्गिक अधिवासात सोडले जाते.

हत्तींमुळे जीवितहानी होण्याचे प्रकार कर्नाटकातही घडले आहेत. पण त्यानंतर कर्नाटकने हत्तीला रोखण्यासाठी ठोस पावले उचलून हत्ती पकड मोहिमेबाबत अनेक उपाययोजना राबविल्या. त्याचा चांगला उपयोगही होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर करून हत्तीच्या संपूर्ण हालचाली त्यांना आपल्या कार्यालयात बसून पाहता येतात, एवढेच नव्हे, तर कार्यालयात बसून फिल्डवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हत्तींची माहिती देतात. कर्नाटक वन विभागाची हत्तीप्रवण क्षेत्रातील कार्यपद्धती पाहता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महाराष्ट्र राज्याने त्याचे अनुकरण करून कर्नाटक पॅटर्न राबविला पाहिजे.

असं म्हटलं जातं, की राजकारणी लोक पटकन एखादा मोठा प्रश्न सोडवित नाहीत, जसे की सी-वर्ल्ड प्रकल्प, नाणार प्रकल्प असे अनेक प्रकल्पांचे भिजत घोंगडे आहे. एखादा विषय आणायचा आणि वर्षानुवर्षे त्यावर राजकारण करायचे, असे सुरू असते पण हत्तीचा प्रश्न फार गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या जीविताशी आणि शेती उत्पन्नाशी संबंधित असल्याने हत्ती प्रश्नाचे तरी भिजत घोंगडे न ठेवता, तो लवकरात लवकर सोडविला पाहिजे. माणसाच्या जीवाशी खेळ करू नये. हत्ती पकड मोहिम खर्चिक असली, तरी कर्नाटक पॅटर्नची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना भयमुक्त करावे, हीच अपेक्षा आहे.

संदीप गावडे

Advertisement
Tags :

.