Konkan News: खरिपात बहरणार 'कारळा' तिळाचे पिवळं सोनं! शेतीला मिळणार नवी उभारी
तिळाच्या वाणाचे खरीप हंगामासाठी ५० किलो बियाणे वितरीत करण्यात आले
रत्नागिरी : जिल्ह्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या मात्र काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेल्या तीळ शेतीला कोकण कृषी विपीठाच्या माध्यमातून प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यासाठी आता कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या 'कारळा' या तिळाच्या वाणाचे खरीप हंगामासाठी ५० किलो बियाणे वितरीत करण्यात आले आहे.
जेणेकरून शेतकऱ्यांना पावसाळी तिळाच्या शेतीतून उत्पन्न मिळू शकणार आहे. तसेच आंबा, काजू बागायतीमध्ये आंतरपीक म्हणून 'कारळा तिळाचे घेता येणार असल्याचे येथील कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राचे अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून पारंपरिक तिळाच्या जाती वापरात असल्या तरी त्यांची उत्पादकता कमी आहे. पारंपरिक तिळाची उत्पादकता कमी असल्याने हे पीक दुर्लक्षित झाले. त्यामुळे जिल्ह्यात परदेशातून तिळाची आवक होत असते. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येवील भात संशोधन केंद्राने 'कारळा' तिळावर संशोधन केले. त्याद्वारे नवीन वाण विकसित केले आहे.
कोकण कृषी विद्यापीठाचे तिळावरील पहिलेच संशोधन आहे. विद्यापीठाने तयार केलेले हे वाण हेक्टरी ४५० ते ५०० किलो उत्पादन देणारे असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात तीळ लागवडीचे क्षेत्र अवघे ०.२० हेक्टर इतकेच होते. खरीप हंगामात जिल्ह्यात भात मुख्य तर नागली नाचणीचे दुय्यम पीक घेतले जाते.
पडिक, वरकस, पाण्याचा निचरा होणाऱ्या जागेत तिळाचे पीक उत्तम येते. पारंपरिक वाणामुळे उत्पादकता कमी असल्याने २०१४-१५ पासून कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्रात यावर संशोधन सुरू होते. नाशिक, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रातील तिळाच्या जाती एकत्र करून संशोधन करण्यात आले.
संशोधन पूर्ण होऊन 'कारळाचे नवीन वाण विकसित करण्यास यश आले आहे. कमी पाण्यात, कमी दिवसात हे पीक तयार होते. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन वाणाची चाचणी सुरू आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून मागणी जास्त होत आहे. आंबा, काजू बागायतीमध्येही आंतरपीक म्हणून 'कारळा' तिळाचे घेता येणार आहे.
कारण या तीळ शेतीवर
मधमाशांचा वावर मोठ्या प्रमाणात राहतो. त्यामुळे बागायती शेतीत फळ उत्पादकता वाढण्यासही मदत होते. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्रात संशोधित केलेले पीक नक्कीच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल व लागवडीला प्रोत्साहान मिळणार आहे.
तीन महिन्यात पीक तयार..
"शेतकऱ्यांकडूनही तिळाच्या वाणासाठी केली जात असलेली मागणी लक्षात घेता विद्यापीठाचे संशोधन पूर्ण होऊन हे नवे वाण विकसित करण्यात आलेय. ऑगस्टच्या शेवटी लागवड केली तरी तीन महिन्यात पीक तयार होते. विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे पिकासाठी कमी दिवस, श्रम, वेळ व पैसा कमी लागतो. तिळातील तेलाचे प्रमाण ४२ टक्के आहे. ३५ ते ४० दिवसात फुलोरा येऊन ९० दिवसात पीक तयार होते."
- डॉ. विजय दळवी
कारळा तिळाचे फायदेः
- पडिक, वरकस, पाण्याचा निचरा होणाऱ्या जागेत तिळाचे पीक उत्तम येते.
- काळ्या तिळामध्ये कॅल्शिअम, फायबर, लोह, फॉस्फरससारखे पोषक घटक
- आहारात काळ्या तिळाचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारते.
- केस व त्वचेलाही फायदा होतो.
- आहारात तीळ, तिळाचे तेल याचाही वापर केला जातो.
- तिळात तेलाचे प्रमाण जास्त व गुणवत्ता असल्याने मागणीत वाढ.