आयएमईआरच्या सभागृहात कारगिल विजय दिन साजरा
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रबुद्ध भारत, केएलएस व आयएमईआर या तीन संस्थांतर्फे आयएमईआरच्या सभागृहात कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडंट बिग्रेडियर जॉयदीप मुखर्जी, कर्नल रामकृष्ण जाधव व डॉ. अलका काळे, आयएमईआरचे संचालक आरिफ शेख आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंदन यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर कारगिल युद्धामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रक्षिका यांनी प्रार्थना सादर केली. किशोर काकडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. अलका काळे यांनी प्रबुद्ध भारत संस्थेची तर कर्नल रामकृष्ण जाधव यांनी फिन्सची माहिती दिली. व पाहुण्यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी कारगिल युद्धात सैनिकांच्या त्यागामुळे व अतुल्यनिय पराक्रमामुळे आपण हा विजय प्राप्त केला आहे, असे सांगितले. कर्नल मधुकर कदम यांनी कारगिल युद्धाची पार्श्वभूमी सांगितली. दृकश्राव्य माध्यमातून कर्नल शाम विजय सिन्हा यांनी कारगिल युद्ध, तेथील कठीण परिस्थिती पाकिस्तानने दिलेला धोका, डोळ्यासमोर घायाळ होणारे आपले सैनिक, तसेच विशेष कामगिरीवर असताना आपल्या सहकाऱ्यांना लागलेल्या गोळ्या, आपण स्वत: कसे जखमी झालो, गैरसमजामुळे आपल्याला कसे मृत घोषित केले गेले आणि त्यामुळे आई, आणि कुटुंबीयांची झालेली अवस्था याचे उत्कट वर्णन केले.
सूत्रसंचालन डॉ. वैभव बाडगी यांनी केले. आनंद भुकेबाग यांनी आभार मानले. श्रेया यांनी गायिलेल्या संपूर्ण वंदे मातरम्ने सांगता झाली.