कन्हय्या मित्तल यांचा काँग्रेसप्रवेश रद्द
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रसिद्ध भक्तीगीत गायक कन्हय्या मित्तल यांनी आपला काँग्रेस प्रवेश करण्याचा निर्णय रद्द केला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. तथापि, अनेक संत, महंत आणि राजकीय नेत्यांनी माझे मनपरिवर्तन केले असून त्यामुळे मी काँग्रेस प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला आहे, माझी चूक माझ्या लक्षात आली आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. ‘जो राम को लाये है, हम उनको लायेंगे’ हे प्रसिद्ध गाणे गायल्याने ते 2024 च्या लोकसभा निवडणूक काळात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. मात्र, हरियाणा विधानसभा निवणुकीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली होती. मात्र, अनेक निकटवर्तीय आणि मित्रांनी मला असे न करण्याची सूचना केली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीही माझ्याशी संपर्क केला आहे. साऱ्या मान्यवरांचा विचार घेऊन मी माझा काँग्रेसप्रवेशाचा निर्णय मागे घेतला आहे. काँग्रेसमध्ये लवकरात लवकर प्रवेश करु असे त्यांनी 8 सप्टेंबरला घोषित केले होते. मात्र, तीनच दिवसांमध्ये त्यांचे मतपरिवर्तन झाले आहे.