Good News : कळझोंडी धरण दुरुस्ती पूर्ण, लवकरच पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणारा
45 वर्षे जीर्ण धरणाच्या दुरुस्तीवर 40 कोटी खर्ची, 14 गावांना होतो पाणीपुरवठा
रत्नागिरी : तालुक्यातील कळझोंडी धरण धोकादायक असल्याचा अहवाल 2005 मध्येच प्राप्त झाल्यानंतर या धरणाच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता या धरणाच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वास गेलेले आहे. धरणाच्या भिंतीला जॅकेटींगच्या कामावर सुमारे 40 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे या दुरुस्ती काम योग्य असल्याचा अहवाल देण्यात आल्याने या धरणातून आता परिसरातील गावांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशासनाच्या अखत्यारित येत असलेले कळझोंडी येथील धरण सुमारे 45 वर्षांपूर्वी उभारण्यात आले. मात्र या धरणाची पूर्वीची दगडी बांधकामाची असलेली भिंत जीर्ण झाल्याने त्याची दुरुस्ती करणे गरजेचे होते. 2005 मध्ये या धरणाच्या जीर्ण भिंतीमुळे धोकादायक असल्याचा अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव करण्यात आला होता.
त्यानुसार धरणाच्या भिंती तसेच सर्व साधन सामग्रीची आयुष्य मर्यादा संपल्याने धरणाला जॅकेटींग करून त्याची उंची वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्या दुरुस्तीमध्ये धरणाच्या भिंतीची उंची 5 मीटरने वाढवण्याच्या कामाचा समावेश होता. जयगड परिसरातील गावांमध्ये उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दुरुस्तीचे काम येथील प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी धरणाच्या या कामामुळे ग्रामस्थांना पाणीपुरवठ्यासाठी तोडगा काढत जिंदल कंपनीच्या पाणी योजनेतून या पंचक्रोशीतील सैतवडे, जांभारी, वाटद, कळझोंडी, गडनरळ, आगरनरळ, पन्हळी, सत्कोंडी, कांबळेलावगण, चाफेरी, कासारी, वरवडे या गावांना पाणी देण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता.
दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानंतर धरणाच्या जुन्या भिंतीला काँक्रीटचे जॅकेटींग करण्यात आले आहे. या दुरुस्तीनंतर धरणाची उंची आता 10 मीटरची झाली आहे. या धरणाची लांबी 95.5 मीटर इतकी आहे. त्याचबरोबर वॉल टॉवर, ग्रेडवॉल, पिचिंग, तेथील पुल, रोडची दुरूस्ती अशी इतर कामेही करण्यात आली आहेत. धरणाच्या दुरुस्ती झालेल्या कामाची पाहणीही पुणे येथील संस्थेकडून करण्यात आली होती. त्यामुळे जुनी आणि नवीन पाणी योजना अशी सांगड घालून अवलंबित असलेल्या गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.
धरणासंबधीत ठळक बाबी :
- जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेले 45 वर्षांपूर्वीचे जुने धरण
- कळझोंडी धरणातून 14 गावांना होतो पाणीपुरवठा
- पंचक्रोशीतील सुमारे 22 हजार ग्रामस्थांना पाणीपुरवठा
- 95.5 मीटर लांबीच्या धरणाची दुऊस्तीनंतर उंचीत 5 मीटरने वाढ