For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कळंबा तलावातील मत्स्य व्यवसाय प्रदूषणाच्या विळख्यात

01:45 PM Aug 01, 2025 IST | Radhika Patil
कळंबा तलावातील मत्स्य व्यवसाय प्रदूषणाच्या विळख्यात
Advertisement

कळंबा / सागर पाटील :

Advertisement

कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा तलावात यंदा मुबलक पावसामुळे पाणीसाठा समाधानकारक झाला असून, त्यामुळे मत्स्य व्यवसायास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे १०० लहान-मोठ्या नैसर्गिक व कृत्रिम जलसाठ्यांत रोहू, कटला, मृगल, ग्रास कार्प, वाम यांसह अन्य गोड्या पाण्यातील माशांचे संगोपन करण्यास मच्छीमारांनी सुरुवात केली आहे. यामुळे मत्स्य उत्पादनाचा वेग वाढण्याची आशा आहे. मात्र दुसरीकडे जलप्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे मासे मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडत असून, अनेक मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नुकतीच रंकाळा तलावात माशांसोबतच तीन कासवे मृत आढळून आली. या घटनेनंतर मच्छीमारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, जलप्रदूषणाविरोधात प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आहे.

  • मत्स्य बीजांचे उत्पादन वाटप

कोल्हापूरमधील रंकाळा मत्स्य बीज केंद्र हे जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी दिलासा ठरले आहे. येथे दरवर्षी सुमारे ५० लाखांहून अधिक स्पॉन म्हणजेच अंडी फलित मत्स्य बीजांची निर्मिती केली जाते. या बियांचे अल्प दरात वितरण केल्यामुळे मच्छीमारांना दर्जेदार उत्पादन मिळते. याशिवाय, नांदेड, कर्नाटक व हडपसर येथून देखील उच्च प्रतीची बीजे आणून तलावांमध्ये सोडली जातात. प्रत्येक बियासाठी योग्य खाद्य, ऑक्सिजनयुक्त पाणी व वाढीसाठी अनुकूल वातावरणाची काळजी घेतली जाते.

Advertisement

  • उद्योग, प्रशासन, नागरिकांची जबाबदारी

मच्छीमारांनी उत्पादनात गुंतवणूक करून मेहनतीने मासे वाढवले तरी शेवटी प्रदूषणामुळे मासे मरत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. तलावात जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते सोडण्याचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशी मच्छीमारांची मागणी आहे. तसेच, नागरिकांनी गणपती किंवा इतर धार्मिक पूजांनंतरचे निर्माल्य, प्लास्टिक, जैविक कचरा थेट तलावात फेकण्याऐवजी निश्चित ठिकाणी टाकण्याबाबत जागृती होणे आवश्यक आहे.

  • रंकाळा मत्स्य बीज केंद्राचे योगदान

जिल्हा मत्स्य व्यवसाय संघाचे अध्यक्ष दत्ताराज शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंकाळा मत्स्य बीज केंद्रातून मच्छीमारांना बीजे स्वस्त दरात दिली जात आहेत. यामुळे उत्पादन खर्च कमी होत असून नफा वाढतो. यापुढील काळात यासारखी आणखी केंद्रे उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित केली जात आहे. कळंबा तलावासह कोल्हापूर जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये मत्स्य उत्पादनाला प्रचंड संधी आहे. स्थानिक प्रशासन, नागरिक आणि मच्छीमारांनी एकत्रितपणे काम केल्यास गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय पुन्हा बहरू शकतो. यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे येण्याची गरज आहे.

  • कळंबा तलावः मत्स्य उत्पादनाचे केंद्र

कळंबा तलाव हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख जलसाठ्यांपैकी एक आहे. येथील मुबलक पाणीसाठ्यामुळे मत्स्य उत्पादनासाठी हा तलाव आदर्श मानला जातो. दरवर्षी लाखो मत्स्य बियांचे संगोपन येथे केले जाते, ज्यामुळे स्थानिक मच्छीमारांना रोजगार मिळतो. रोहू, कटला, मृगल यासारख्या माशांच्या जातींचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणात होते.

कळंबा तलावाच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास हा तलाव पुन्हा मत्स्य उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनू शकतो.

कळंबा तलाव हा कोल्हापूर शहराचा एक महत्त्वाचा जलसाठा आहे. याठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने मत्स्य बीजे सोडली जातात आणि स्थानिक मच्छीमारांना रोजगाराची संधी निर्माण होते. परंतु, सध्या तलावात साचलेला जैविक कचरा, प्लास्टिक व रसायने यामुळे पाणी सडल्यासारखे दिसते. तलावाच्या काठावर प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांचे उरलेले अंश, फुलं-फळांचे निर्माल्य मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे तलावाची उपयुक्तता कमी होत असून, मत्स्य उत्पादनाचा दर्जाही घसरत आहे

  • रंकाळा मत्स्य बीज केंद्र : मच्छीमारांना दिलासा

रंकाळा मत्स्य बीज केंद्रात ५० लाखांहून अधिक मत्स्य बियांचे संगोपन करून मच्छीमारांना अल्प दरात वितरण होणार. ही योजना मच्छीमारांचे उत्पन्न वाढवेल, पण प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

                                                            - दत्ताराज शिंदे, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती मत्स्य व्यवसाय सहकारी संघ

  • शासनाकडून आधुनिक उपाय योजनांची अपेक्षा

गेल्या काही वर्षांत गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन हा एक फायदेशीर व्यवसाय म्हणून पुढे आला आहे. मात्र, त्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शासनाने खालील उपाय योजना कराव्यात, अशी मच्छीमारांची मागणी आहे:

अनुदानावर मत्स्य बियांचे वाटप

आधुनिक मत्स्य संगोपन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

जलप्रदूषण नियंत्रणासाठी कठोर नियम व त्यांची अंमलबजावणी

जलस्रोतांच्या स्वच्छतेसाठी नियमित तपासणी व कारवाई

मत्स्य व्यवसायासाठी वेगळी निधी योजना व विमा संरक्षण

Advertisement
Tags :

.