कडोली-काकती संपर्क रस्ता,मार्कंडेय बंधाऱ्यालगतचा रस्ता खचला
सरकारी हद्दीतून रस्त्याचे बांधकाम त्वरित करण्याची नागरिकांची मागणी
वार्ताहर /काकती
कडोली-काकती या दोन गावांना जोडणारा संपर्क रस्ता आणि मार्कंडेय नदीकाठी बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्याच्या नदीपात्राला लागून संपर्क रस्ता मोठ्याप्रमाणात खचला आहे. अनेकवेळा बांधकाम करण्यात आले. मात्र पावसाळ्यात नदी पुराने खचत आहे. यावर योग्य तोडगा म्हणजे नदीकाठ सोडून सरकारी हद्दीतून बांधकाम केल्यास कायमची समस्या मिटणार आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि या प्रकल्प अंमलबजावणीचे कार्यकारी अभियंता नियोजन विभाग बेळगाव यांच्याकडून साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कडोली-काकती ग्रामस्थांतून केला आहे. नदीपात्राबाहेरुन रस्ता पक्का बांधल्यास सुरक्षित व मजबूत होणार आहे. रस्त्याचे बांधकाम करून त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग, ग्रामीण विकास संस्था बेंगळूर यांच्या ‘आमचे गाव आमचा रस्ता’ या योजनेअंतर्गत दोन गावे जोडणाऱ्या निधीतून विद्यमान मंत्री सतीश जारकिहोळी यांनी निधी मंजूर केला होता. या 4 किलोमीटरच्या रस्ता कामासाठी 3 कोटी 20 लाख 16 हजार रुपये खर्चून रस्ता व बंधारा बांधण्यात आला होता. या कामाच्या देखभालीसाठी वेगळा खर्च देखील राखीव ठेवण्यात आला होता. त्याप्रमाणे दोन-तीन वेळा खर्च करून बांधण्यात आले. मात्र दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता नदीपात्राला लागून असल्याने खचत आहे. परिणामी खर्च केलेला निधी वाया गेला आहे. पावसाळ्यात व आजही रात्रीच्या वेळी या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणे धोक्याचे झाले आहे. लहान-सहान यापूर्वी दुर्घटना घडल्या आहेत. या प्रकल्पाचे अंमलबजावणी अधिकारी जि. पं. कार्यकारी अभियंता असून यांनी नदीपात्राला लागून रस्ता बांधकामाला परवानगी देणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. सरळ सरकारी हद्दीतून रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.