वृद्ध रेशनकार्डधारकांना घरपोच धान्यपुरवठा करण्याची कदंब फाऊंडेशनची मागणी
खानापूर : तालुक्यातील 75 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना तसेच दिव्यांग कार्डधारकांना सरकारच्या आदेशानुसार रेशन दुकानदारांनी वृद्ध, दिव्यांग लोकांना घरपोच धान्य देणे गरजेचे आहे. मात्र खानापूर तालुक्यातील रेशनदुकानदार घरपोच धान्य देत नसल्याने वृद्ध आणि दिव्यांगाना सरकारी धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. यासाठी रेशन दुकानदारांनी वृद्ध आणि दिव्यांगाना घरपोच रेशन पोच करावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना कदंब फाऊंडेशनतर्फे दिले. यावेळी कदंब फाऊंडेशनचे अध्यक्ष जॉर्डन गोन्साल्विस, एम. जी. कुमार, अॅड. आकाश अथणीकर, मायकल अंद्रादे, पिंटू साळुंखे, किशोर कलाल, कारु लिमा उपस्थित होते. जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी निवेदनचा स्वीकार करून सबंधित खात्याला सूचना करू, असे आश्वासन दिले.
ग्रामीण भागातील रेशनदुकानदार वृद्ध, दिव्यांगाना रेशन दुकानाद्वारे पुरवण्यात येणारा धान्य घरपोच देत नसल्याने त्यांना सरकारच्या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत खानापूर अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देवूनही त्यांनी गांभीर्याने घेतले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. संगरगाळी येथील काही वृद्ध दिव्यांगाना गेल्या काही महिन्यापासून धान्यपुरवठा केला नसल्याने संगरगाळी वृद्ध व दिव्यांगांना धान्यापासून वंचित रहावे लागले आहे. यासाठी संबंधित दुकानदाराना सूचना करुनही घरपोच धान्यपुरवठा केला नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून धान्यपुरवठा घरपोच करण्याची मागणी केली आहे.